प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे यांची शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड
शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे यांची शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या (Board of studies in Economics) चेअरमनपदावर बिनविरोध निवड झाली. नोव्हेंबर 2022 मध्ये अर्थशास्त्र अभ्यास मंडळाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत डॉ. इंगळे हे सदस्यपदी बहुमताने निवडून आले होते.दिनांक 6मार्च 2023 रोजी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आहे.तथापि BoS Chairman पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज विद्यापीठात आला असल्यामुळे त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे हे रयत शिक्षण संस्थेच्या हुपरी येथील चंद्राबाई-शांताप्पा शेंडूरे महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागात प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख या पदावर काम करीत आहेत. त्यांनी संस्थेच्या उंब्रज, कोरेगाव, लोणंद, सोलापूर, हुपरी, मोखाडा, पनवेल, मंचर, विटा इत्यादी महाविद्यालयात काम केले आहे.त्यांना अध्यापन आणि संशोधनाचा सुमारे 32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.
डॉ. इंगळे हे ट्रिपल पोस्ट ग्रॅड्यूएट असून त्यांनी शिवाजी विद्यापीठाची एम. फील आणि पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. त्यांचे 100 शोधनिबंध,02 क्रमिक पुस्तके,06 संशोधन ग्रंथ,30आर्थिक व सामाजिक लेख, प्रसिद्ध आहेत. अर्थशास्त्र विषयाच्या 150 परिषदा, सेमिनार व कार्यशाळाना ते उपस्थित राहिले आहेत. त्यांनी 50 पेक्षा अधिक शोधनिबंध सादर केले आहेत. आर्थिक व सामाजिक विषयावर विविध ठिकाणी त्यांनी 100 च्यावर व्याख्याने दिली आहेत. अर्थशास्त्र व सामाजिक विषयावर त्यांची YouTube वर 100 च्यावर व्याख्याने आहेत. म. गांधी या विषयावर YouTube वर 120 व्याख्याने देण्याचा संकल्प त्यांनी केला असून आत्तापर्यंत या विषयावर त्यांनी 60 व्याख्याने दिली आहेत.
प्रा. डॉ. इंगळे यांच्या आर्थिक व सामाजिक लेख, शोधनिबंध, संशोधन ग्रंथ इत्यादीना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सुमारे 30 पारितोषिके त्यांना प्राप्त झाली आहेत. ही पारितोषिके त्यांना मा. शरदचंद्रजी पवार साहेब, भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. मोन्टेक सिंग अहलुवालिया, ना. सुषमा स्वराज यांच्या हस्ते मिळाली आहेत. त्यांना 02 आदर्श शिक्षक पुरस्कार,02 समाज गौरव पुरस्कार,02 बेस्ट रिडर अवॉर्ड प्राप्त झाले आहेत.
डॉ. इंगळे हे आदिवासी समाजाचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागात अनेक वर्षे नोकरी केली आहे. संस्थेने दिलेल्या या संधीचे त्यांनी सोने केले असून आदिवासी या विषयावर त्यांनी 06संशोधन प्रकल्प,06संशोधनग्रंथ,01प्रबंधिका,01प्रबंध,50शोधनिबंध, 20लेख एवढे लिखाण केले आहे.आदिवासी भागातील बदली ही शिक्षा न मानता ती सामाजिक बांधिलकी मानून ते आजही आदिवासी भागात जाऊन अभ्यास करीत आहेत.
डॉ. इंगळे हे शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या “शिवार्थ”या रिसच जर्नलचे प्रमुख संपादक आहेत. मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर ते नुकतेच बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यांची आता शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.