महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार निवडणूक
दोन गटात विभागलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोणता पक्ष किती जागा जिंकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे रोजी मतदान होणार आहे.
देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिलला, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी, सहावा टप्पा २५ मे रोजी आणि शेवटचा सातवा टप्पा १ जून रोजी होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही पाच टप्प्यात निवडणूक होणार आहेत. २०२४ ची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक विशेष असणार आहे. दोन गटात विभागलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोणता पक्ष किती जागा जिंकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे रोजी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातील मतदानाचे टप्पे जाणून घ्या
टप्पा १:- १९ एप्रिल २०२४
टप्पा २:- २६ एप्रिल २०२४
टप्पा ३:- ७ मे २०२४
टप्पा ४:- १३ मे २०२४
टप्पा ५:- २० मे २०२४
मतमोजणी :- ४ जून २०२४
महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून, पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ रोजी पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांत मतदान होणार आहे. तर २६ एप्रिल २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यात ८ मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार असून, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच तिसरा टप्पा हा ७ मे रोजी होणार असून, यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चौथा टप्पा १३ मे रोजी पार पडणार असून, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच पाचवा टप्पा २० मे २०२४ रोजी पार पडणार असून, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत, ८० जागांसह उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकत्र निवडणूक लढली होती. तेव्हा एनडीएकडे ४१ जागा होत्या. भाजपाने २३ जागांवर विजय मिळवला, तर शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला. याशिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४, काँग्रेस एक आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने एका जागेवर विजय मिळवला होता