प्रभाग रचनेत फेरफार केल्याने चेंबूरमधील अनेक नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी
मुंबई – मुंबई महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर नवीन ९ प्रभागाच्या निर्मितीसाठी फेरफार करण्यात आल्याने चेंबूरमधील अनेक नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.यामध्ये गेली पाच वर्षे सातत्याने विकासकामे केलेल्या विभागातील हक्काचे मतदार गमावण्याची वेळ या अनेक नगरसेवकांवर आली आहे.
चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १५२ आणि प्रभाग क्रमांक १५३ मधील हजारो मतदारांना नवीन प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याने या मतदारांनामध्ये सुद्धा नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. प्रभाग क्रमांक १५२ या प्रमुख सुभाषनगर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीतील हजारो मतदार बाजूच्या मतदार संघात स्थलांतरित करण्यात आले आहेत.तर प्रभाग क्रमांक १५३ या बोर्ला घाटला परिसरातील केळकरवाडी,अमरनगर आणि लकडीनगर विभागातील मतदारांना बाजूच्या नव्याने अस्तित्वात येणार्या मतदारसंघात समाविष्ट केले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक आणि मतदार दोघेही नाराज झाले आहेत.या दोन्ही मतदार संघातील नगरसेवकांचे गेल्या कित्येक वर्षांचे सर्व स्तरातून जोडले गेलेले हजारो मतदार आता विस्थापित होणार आहेत.ते बाजूच्या प्रभागाशी जोडले जाणार आहेत.वास्तविकता हे मतदार विद्यमान नगरसेवकांचे हक्काचे आणि हमखास खात्रीचे मतदार आहेत.पण आता ते गमावण्याची वेळ नगरसेवकांवर आल्याने काही दिवसांपासून त्यांच्यात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.चेंबूर विभागातील आणखी काही नगरसेवकांही अशीच प्रभाग फेररचनेची झळ पोहोचणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.