कराड येथील प्रशासकीय सर्किट हाऊस मध्ये पारधी जमातीच्या मागासलेल्या समाजव्येवस्थेचा परिसंवाद…… मागासलेपणास आजची समाजव्यवस्थाच जबाबदार! प्रा. डॉ.मच्छिंद्र सकटे….
नेर्ले (ता.वाळवा )
पराक्रमाचा आणि शौर्याचा महान वारसा असुनही ज्यांच्यावर गुन्हेगारीचा आरोप ठेवण्यात आला आहे, त्या आरोपातून आजही मुक्ती न मिळाल्याने स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतही अत्यंत मागासलेल्या पारधी समाजाच्या उद्धवस्त आयुष्यं जगण्यास आजची समाज व्यवस्थाच जबाबदार आहे.असे मत दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे यांनी कराड येथे बोलताना व्यक्त केले.ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती व मुक्ता प्रतिष्ठान कराड आयोजित पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे लिखीत ‘पारधी समाजजीवन एक अवलोकन!’या पुस्तकावरील परिसंवादामध्ये अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.या कार्यक्रमास कराडचे तहसीलदार विजय पवार, पत्रकार प्रमोद सुकरे, शशिकांत पाटील, पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे, रामराव दाभाडे, कैलास पवार,प्रा.दिपाली वाघमारे,प्रा.पुजा बल्लाळ,चित्रकार चंद्रकांत भिसे, गोरख काळे, शितल काळे,शिवाजी पवार, पुजा काळे, जयवंत सकटे,अक्षय सुर्वे यांच्यासह अनेक पारधी समाज बांधव उपस्थित होते.
प्रा.सकटे पुढे म्हणाले, की १८७१ मध्ये ब्रिटिश सरकारने पारधी समाजावर मारलेला गुन्हेगारीचा शिक्का आजही देशातील शासन प्रशासन आणि समाज पारधी जमातीकडे गुन्हेगार म्हणून बघत असल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक सामाजिक विकास होऊ शकला नाही.हे एक वास्तव आहे.प्रकाश वायदंडे यांच्या ‘पारधी समाजजीवन एक अवलोकन’ या ग्रंथामुळे पारध्यांचे समाजजीवन समजून घेण्यासाठी व विकासासाठी मोठी मदत होऊ शकते.
तहसिलदार विजय पवार म्हणाले की, पारधी समाजाचे वास्तव जीवन समजून घेण्यासाठी या ग्रंथाची मदत होत असुन पारध्यांच्या पुनर्वसनाच्या कामाला प्रशासनास दिशा मिळू शकते.
पत्रकार प्रमोद सुकरे म्हणाले की,प्रकाश वायदंडे यांनी गेली अनेक वर्षे पारधी समाजामध्ये स्वत: ला झोकून देऊन त्यांच्या न्यायहक्काची चळवळ चालविली आहे.पारध्यांच्या सामाजिक जीवनाचा शोध घेण्याच कार्य त्यांनी पारधी समाजजीवन एक अवलोकन’या ग्रंथातून केले आहे.
यावेळी रामराव दाभाडे, कैलास पवार यांनी मनोगत व्यक्त केले,स्वागत- प्रास्तविक संजय तडाखे यांनी केले तर आभार प्रा. पै.अमोल साठे यांनीमानले.सुत्रसंचालन कॉ.अमोल जाधव यांनी केले.