परीक्षेची सांगता, विभाग सचिवांनी मानले सर्वाचे आभार !
१२ वी चा शेवटचा पेपर व्यवस्थितपणे पार पडला आणि त्यासोबतच सन २०२२ च्या दहावी-बारावीच्या परिक्षेचीही यशस्वी सांगता झाली….!
प्रमोद पाटील,
पालघर जिल्हा प्रतिनिधी
कोविडच्या पार्श्वभूमीवरील ही आव्हानात्मक परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यात मंडळ अधिकारी,सर्व कर्मचारी, शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक कार्यालय, बृहन्मुंबई महापालिका शिक्षण विभाग, परिरक्षक, केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक, समवेक्षक शिक्षक, धावक, पोलीस शिपाई, परिरक्षण केंद्रातील आणि परीक्षा केंद्रातील कार्यालयीन कर्मचारी व तितक्याच आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे गेलेले विद्यार्थी व शाळांच्या व्यवस्थापनातील साहाय्यकारी अन्य घटकांचे चांगले योगदान लाभले. त्याबद्दल मुंबई विभागीय मंडळाच्या वतीने विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार सुद्धा व्यक्त केले आहेत.
डॉ. बोरसे यांनी सांगितले की, सेनापती कणखर आणि सैन्याला बळ देणारे असले तर अवघड किल्लासुद्धा सर करता येतो याची प्रचिती या परीक्षे दरम्यान आली. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षण संचालक, राज्यमंडळ सचिव, राज्य मंडळ अधिकारी व मंत्रालयीन अधिकारी महोदयांच्या सहकार्याने राज्यमंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी योग्य नियोजन करून व सातत्याने आढावा बैठका घेऊन तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहित करून ही आव्हानात्मक परीक्षा कोणतेही गालबोट न लागता यशस्वीपणे पार पाडली. मुंबई विभागीय स्तरावर विभागीय अध्यक्ष नितीन उपासनी यांनीही सर्व मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखवला आणि वेळोवेळी प्रोत्साहन दिले, त्यामुळे ही कामगिरी पार पाडण्यात आम्ही यशस्वी झालो.याप्रसंगी राज्यमंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी सर्व मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून धन्यवाद दिले आहेत.