जीवनाचे ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास, आपण जीवनात निश्चितपणे यशस्वी व्हाल-प्रतिकदादा पाटील
इस्लामपूर दि. १३ (प्रतिनिधी)
पाश्चात्य राष्ट्रातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून त्यासाठी अहोरात्र कष्ट घेतात. आपणही आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास, आपण जीवनात निश्चितपणे यशस्वी व्हाल, अशी भावना महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी आरआयटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमधील बक्षिस वितरण समारंभात बोलताना व्यक्त केली.
कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू पाटील शैक्षणिक साहाय्य मंडळाच्या वतीने संस्थेतील गुणवंत विद्यार्थी-विध्यर्थिनींचा सन्मान व बक्षिस वितरण समारंभात ते बोलत होते. कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामरावकाका पाटील,सचिव आर.डी.सावंत, सह सचिव राजेंद्र कुरळपकर,शैक्षणिक साहाय्य मंडळाचे उपाध्यक्ष आर.आर.बडवे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील,श्रीमती कुसुमताई पाटील,तसेच सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,पाश्चात्य राष्ट्रातील विद्यार्थी-विद्यार्थिनी केवळ आपले ध्येय लिहून ठेवत नाहीत,तर आपण आपल्या ध्येयापर्यंत किती टप्पा पार केला? याची सातत्याने पडताळणीही करीत असतात. जीवनात कोण बनायचे आहे,मला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे? हे अगदी स्पष्ट हवे. तरच तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करू शकता. विद्यार्थांनी शालेय जीवनापासून ध्येय निश्चित करून कष्ट घेतल्यास ते जीवनात मोठे यश मिळवू शकतात. गरीब असो,अथवा श्रीमंत शिक्षण हे कुटुंबाच्या सर्वांगिण परिवर्तनाचे मोठे साधन आहे. कष्ट करण्याची तयारी असेल,तर काहीही अशक्य नाही.
संस्थेचे सचिव आर.डी.सावंत म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील हयात असतानाच राजारामबापू पाटील शैक्षणिक साहाय्य मंडळाची स्थापना केली आहे. या संस्थेतील सभासदांनी वर्गणीने रक्कम जमा केली आहे. या रक्कमेच्या व्याजातून क्रिडा स्पर्धा,क्रिडा शिबिरे व खेळाडूंना मदत करीत आहोत. तसेच गुणवंत विद्यार्थीना सातत्याने आर्थिक प्रोत्साहन देत आहेत. १० वी. १२ वी,पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तसेच इंजिनिअरिंग काँलेजच्या विद्यार्थ्यांना,तसेच क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थीना रोख बक्षिस देत आहोत. मंडळा च्या घटनेत दुरुस्ती करुन अधिका-अधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न आहे.
प्रारंभी प्रा. सुभाष खोत यांनी स्वागत केले. शैक्षणिक साहाय्य संस्थेचे उपाध्यक्ष आर. आर.बडवे यांनी आभार मानले. याप्रसंगी अधिक्षक ए.डी.पाटील,पर्यवेक्षक एस.एल. माने,एस.एम.पवार,मुख्याध्यापक एस. आर.गोंधील,पर्यवेक्षक व्ही.व्ही.पाटील, डी.एस.पाटील,एस.के.पाटील यांच्यासह शिक्षक,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.