शिर्डीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
शिर्डी प्रतिनिधी
साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. संस्थेचे संस्थापक कैलासबापू कोते आणि त्यांचे कार्यकर्ते एकत्र येऊन अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी या विवाह सोहळ्याचे आयोजन करतात. यावर्षी अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर दि. ४ मे रोजी सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळा शिर्डीतील किमया गार्डन याठिकाणी आयोजित केला आहे. विवाह सोहळ्याचे हे २१ वे वर्ष असून आजपर्यंत आठराशेहून अधिक वेगवेगळ्या जातीधर्माच्या मुलामुलींचे लग्न पार पडलेले आहे. विशेष म्हणजे कायद्याचे काटेकोरपणे पालन करत जातीय प्रमाणपत्र, जन्मदाखला व इतर महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करून विवाह सोहळ्यात इच्छुक मुलामुलींचे लग्न त्यांच्या धार्मिक रितिरिवाजाप्रमाणे लावली जातात. कैलासबापू को व त्यांच्या पत्नी सुमित्राकाकू कोते हे लग्नाच्या दिवशी कन्यादान करतात. नवरदेव-नवरीला पोशाख, दागिने, संसार उपयोगीवस्तू, शृंगार तसेच घोड्यावर बसवून वाजतगाजत शिर्डी गावातून मिरवणूक अशा सर्व लग्नाच्या विधी अगदी आनंदाने पार पडल्यानंतर वऱ्हाडी मंडळीला मिष्ठांनाची व्यवस्था केली जाते. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध तर हिंदू धर्मीयांचे धर्मगुरू या विवाह सोहळ्यात त्या-त्या धर्माप्रमाणे विवाह सोहळ्यात लग्नाचा विधी पार पाडतात. आपल्या मुलामुलींचे लग्न थाटामाटात होण्याचं स्वप्न मनाशी बाळगून असणाऱ्या आई-वडिलांचे स्वप्न साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून फक्त सव्वा रुपये शुल्क आकारून पूर्ण केले जाते, कोते म्हणाले.