प्रसाद, हारावरील बंदी उठवा – दिगंबर कोते
शिर्डी प्रतिनिधी :
कोरोनाचे सर्व नियम शासनाने हटवल्यामुळे शिर्डी येथील साईमंदीरात हार, फुले, नारळ, प्रसाद पूर्वीप्रमाण सुरू करण्याची गरज आहे. यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार तर फुल शेतीसाठी ज्यांनी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली आहे त्यांना आर्थिक आधार मिळेल. यासाठी साईबाबा संस्थानने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना पाठवलेल्या निवेदनात सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांनी केली आहे. याबाबत जर निर्णय झाला नाही तर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कोते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेले हार, फुले, नारळ, प्रसाद, साई मंदिरात नेण्याची परंपरा कोरोना काळात बंद पडल्याने या व्यवसायातील अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला. याचा बेरोजगारांना त्रास होत आहे. तसेच फुलशेती उत्पादक अडचणीत आले आहेत. शिर्डीचे साईमंदीर वगळता भारतातील सर्व मंदीरामध्ये हारप्रसाद, फुले, नारळ नेण्यास बंदी नसताना शिर्डी साईबाबा मंदिरातच बंदी का असा सवाल विचारला जात आहे. साई संस्थानच्या बंदीमुळे साईभक्तांच्या श्रध्देला तडा जात आहे. हार, फुले साईमंदीरात नेण्यास बंदी असल्यामुळे शिर्डी परीसरातील शेतकरी, व्यापारी यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने नियम शिथिल केल्यामुळे आता साईमंदीरात हार, फुले, नारळ, प्रसाद नेण्यास बंदी करणे ही अन्याय करणारी बाब आहे. अशी बंदी घालून साईसंस्थान साईभक्तावर अन्याय करत आहे. साईसंस्थान शिर्डी यांनी साईसमाधी मंदीरात पुर्वीप्रमाणे हार, प्रसाद, नारळ, फुले नेण्यास परवानगी द्यावी अन्यथा नाईलाजाने अन्नत्याग उपोषणास बसावे लागेल असा इशारा कोते यांनी दिला आहे.