चारित्र्य, आरसा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा..
आपल्या प्रत्येक कृती त्याच्या मागील भूमिका, त्याच्या मागील विचार या सर्वांचा परिणाम त्यांच्या चारित्र्यावर होत असतो. डॉक्टर शाळीग्राम भंडारी..
चारित्र्य, आरसा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा..
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर ७ ऑक्टोबर.
आपल्या प्रत्येक कृती त्याच्या मागील भुमिका , त्याच्या मागील विचार या सर्वांचा परिणाम त्यांच्या चारित्र्यावर होत असतो.आज आपण रोज सकाळी कुठलेही ,वर्तमानपत्र उघडलं की अत्यंत धक्का देणाऱ्या, सुन्न करणाऱ्या अशा बातम्या आपल्याला वाचायला मिळतात, थोड्याशा संपत्तीसाठी, जमिनीसाठी ,पक्षासाठी, सत्तेसाठी ,लोभासाठी भावाचा– भावाने ,पित्याने– पुत्राचा, मातेने– मुलाचा ,मित्राने –मित्राचा खून केलेला आहे, त्याच्यावर अत्याचार केलेला आहे, अन्याय केलेला आहे. कुठे गेली ती संस्कार देणारी कुटुंब,ती विद्यालये,ती महाविद्यालये, ती समाज प्रबोधन करणारी कीर्तने ,व्याख्यान ?
वीस-तीस वर्षांपूर्वी आपला देश आर्थिक दृष्ट्या थोडा दुबला होता, विकासाच्या दिशेने दृष्टीने वाटचाल करीत होता ,अमेरिकन लोक उज्वल भविष्याची स्वप्न पाहत होते पण त्यावेळी मात्र थोडी तरी नीतिमत्ता, सहिष्णुता, त्याग ,दयाळू वृत्ती राखून होता, बाळगून होता पण जस–जशी समृद्धी आली, पाश्चात्त्य देशांचं अनुकरण झालं ,कमी श्रमात अल्प वेळात त्याच्या हातात पैसा खेळू लागला ,मग तो उन्मत्त झाला ,बेभान झाला त्याच्यावर कोणाचाही अंकुश राहिला नाही, हातातून लगाम सुटलेल्या चौफेर उधळणाऱ्या घोड्यासारखा तो बेधुंद झाला.
आणि हा समृद्धीला मिळालेला शाप आहे कारण जसजशी समृद्धी आली तसंतसं त्याच्या वागण्यात ,बोलण्यात व कृतीत बदल घडत गेला आणि तो आपोआपच यापासून लांब फेकला गेला .
मग या परिस्थितीतून मी स्वतः ,माझं कुटुंब आणि पर्यायाने समाज परिवर्तन घडवू शकतो का?
होय !
संत तुकारामांनी म्हटलं होतं–
” बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ”
म्हणजे जो जसं बोलतो तसं वागतो हे समाज टिपतो आणि समाज त्याची पूजा करायला लागतो.
समाज नुसती त्याची पूजा करत नाही तर त्याप्रमाणे त्याचा आदेश पाळतो. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर ..
स्वातंत्र्यपूर्व काळातील 1942 झाली राष्ट्रपिता महात्मा गांधींनी “चले जाव” या शब्दाचा महामंत्र आपल्या देशाला दिला आणि सर्व देश त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला ,कारण राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मागे उत्तम चारित्र्याचं वलय होतं. त्यांच्या त्यागाचं, सहिष्णुता, त्यांच्या समर्पणाचा एक आदर्श होता.
दुसरे उदाहरण म्हणजे आजचे आपले ‘अण्णा-हजारे’अण्णा हजारेंसारखा एक साधा माणूस वय वर्ष 75 कुठलंही आकर्षक व्यक्तिमत्व नाही पण भ्रष्टाचाराविरुद्ध नि:स्वार्थ बुद्धीने सत्शील चरित्र्यसंपूर्ण आदर्श असलेलं उदाहरण अण्णा हजारेंच्या एक शब्दामुळे संपूर्ण तरुण पिढी त्यांच्या मागे भ्रष्टाचाराचं आंदोलन छेडण्यात समर्थपणे उभी राहिली हा त्यांच्या सच्चचारित्र्याचा विजयच आहे.
म्हणून …
*अंधियारे मे पथ दिखलाओ*
*उनके सुरज तुम बन जाओ*
*निशा अमा को रोशन कर दो*,
*तिमिर तिमिर मे बाती भर दो*”.या अत्यंत स्वार्थाने, नीतिमत्तेने ढासळलेल्या काळात आपल्याला प्रत्येकाच्या हृदयात सत्चरित्र्याची ज्योत पेटवायची आहे.जेव्हा समाज जीवनाचा तोल ढळतो , नीतीचा ऱ्हास होतो आणि माणसाचा पशू होतो तेव्हा समाजाला सावरणारा एखादा महात्मा प्रकट होतो. त्याच्या पावलाने तयार होणारी वाट, लोकजीवनात नवी पहाट निर्माण करते. ही जी महामानव असतात त्यांची जीवन चरित्र ही आपल्यापुढे आदर्श असतात.
चंद्र ,सूर्य ,तारे आणि प्रकाश यांचं एक अतूट नातं असतं. अंधाराविरुद्ध लढणे हा त्यांचा धर्म असतो . अंधारा –अंधारामध्ये फरक एवढाच असतो की ,एक अंधार निसर्गनिर्मित असतो तर दुसरा मानव निर्मित असतो .
आणि हा मानवनिर्मित अंधार दूर करण्यासाठी चांगल्या, “परिपक्क” ,विकसित चारित्र्याची खरी गरज असते .
आणि आपण आपल्या उत्तम चारित्र्याच्या माध्यमातून समाजाला पूरक होऊ शकतो, याची मला आशा नव्हे खात्री आहे.