कल्पेश कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा शनिवारपासून
क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर
मुंबई : ३० व्या कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला येत्या शनिवार, ७ मेपासून सुरुवात होत आहे. माटुंगा येथील न्यु हिंद स्पोर्टिंग क्लबच्या विद्यमाने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले जात आहे. कोविडमुळे गेली दोन वर्षे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. परंतु यंदा मात्र या स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात येणार आहे. २८ मेपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत मुंबई क्रिकेट संघटनेच्या १६ केंद्रांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरातील १६ वर्षाखालील मुलांच्या गटात ही स्पर्धा खेळवण्यात येते. या स्पर्धेला एमसीएने निवड चाचणीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या स्पर्धेला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धेत एकूण २७ सामने रंगणार आहेत. हे सामने प्रत्येकी दोन दिवसांचे असून माटुंगा, कांदिवली, सांताक्रूझ, विरार, डहाणू, नवी मुंबई, वाशी, बेलापूर, नेरुळ येथे हे सामने खेळवण्यात येतील. स्पर्धेचे प्रमुख संस्थापक आणि संयुक्त सचिव गोविंद कोळी यांच्या स्मृती प्रित्यर्थ जे गोलंदाज स्पर्धेत हॅटट्रिक घेतील त्यांना गोविंद कोळी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत वाशी, बेलापूर, घाटकोपर, माहूल, बदलापूर, डोंबिवली, कल्याण, नाहूर, माटुंगा, वरळी, कांदिवली, वांद्रे, भाईंदर, विरार, पी.डी.टी.एस.ए, पोईसर या सोळा केंद्राच्या संघांचा सहभाग आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी साडे आठ वाजता भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडू श्रीमती सुलक्षणा नाईक यांच्या हस्ते मेजर दडकर मैदान, माटुंगा येथे होणार आहे.