खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीवरून पूरबाधित शेतकर्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याचा प्रस्ताव मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे सहकार प्रधान सचिव अनुपकुमार यांना आदेश
शिराळा प्रतिनिधी /
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पूरबाधित शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. खासदार धैर्यशील माने व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली असून मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
राज्यामध्ये जुलै, ऑगस्ट २०१९ व २०२१ या काळात अतिवृष्टीमुळे महापूर आला. यामध्ये सर्वाधिक नुकसान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकर्यांचे झालेले आहे. यासह सातारा, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, नगर, अमरावती, नागपूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांनाही महापुराचा फटका बसला होता. त्यावेळी येथील शेतकर्यांना एक हेक्टरपर्यंत पिक कर्ज व 31 ऑगस्ट 2019 पर्यंतचे व्याज माफ केले होते. मात्र आताच्या कर्जमाफीच्या यादीतून या शेतकर्यांना वगळले आहे. ही बाब खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. सुधारित आदेशात महापूरग्रस्त शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. या निर्णयामुळे त्या शेतकर्यांवर अन्याय होणार आहे. प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहणार्या प्रामाणिकपणे कर्ज भरणार्या शेतकर्यांना नियम व अटी रद्द करून अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्याची विनंती खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली.
ही बाब मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी तातडीने मुख्य सचिव, सहकार मंत्री ना.बाळासाहेब पाटील व अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केली आणि मंगळवारच्या कॅबिनेटसमोर हा विषय ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे या शेतकर्यांना दिलासा मिळण्याची आशा पल्लवित झालेल्या आहेत.