वाटद कवठेवाडी शाळेत हर घर तिरंगा अभियानास उत्साहात सुरुवात
हर घर तिरंगा अंतर्गत प्रभातफेरीमध्ये पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांचा लक्षणीय सहभाग
खंडाळा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासनाच्या धोरणानुसार जाहीर केलेल्या हर घर तिरंगा या अभियानाची रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेत उत्साहात सुरुवात झाली आहे.
या अभियानादरम्यान अनेक राष्ट्रभक्तीपर उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत दिलेल्या नियोजनानुसार आज जनजागृतीपर शाळा परिसरात वाजतगाजत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभातफेरीत विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यादरम्यान भारतीय तिरंगा ध्वज आणि इतर घोषणा देत व गाणी गात शाळा परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. यादरम्यान प्रभातफेरीत भारतमाता आणि इतर पोशाखात आलेल्या विद्यार्थ्यामुळे प्रभातफेरी उठावदार झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमाची माहिती देणारे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
या अभियानाच्या सुरुवातीला शाळेच्या वतीने आयोजित पालक सभेत ध्वज संहिता बाबत शाळेचे उपशिक्षक गोविंद डुमनर यांनी माहिती दिली. तर हर घर झेंडा या उपक्रमाचे उद्दिष्टे आणि सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी देत सर्वानी शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत या अभियानाच्या प्रत्येक टप्प्यावर नियोजित केलेल्या सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या अभियानात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून सर्व विजेत्यांना या अभियानाच्या समारोप प्रसंगी सन्मानित करण्यात येणार आहे.
शाळा परिसरात काढण्यात आलेल्या प्रभातफेरीसाठी आणि सर्व उपक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास बारगुडे, शाळा जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष एकनाथ धनावडे यांनी शुभेच्छा दिल्या तर याप्रसंगी विश्वनाथ शिर्के, नारायण धनावडे, अनिल रेवाळे, मारुती कुर्टे, दिलीप तांबटकर, भिकाजी आलीम यांच्यासह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.