महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडुन मॅग्नेट अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन.
महाराष्ट्र अॅग्रिबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प हा प्रामुख्याने राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रियेसह विपणन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेला आहे. आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ राज्यात मॅग्नेट प्रकल्पाची अंमलबजावणी करीत आहे. सदरचा प्रकल्प हा सहा वर्ष कालावधीचा असुन सन 2026-27 पर्यंत असणार आहे. या प्रकल्पामध्ये कोल्हापूर विभागातील प्रामुख्याने डाळींब, केळी, भेंडी, स्ट्रॉबेरी, हिरवी मिरची, लाल मिरची व फुल पिके या सात पिकांचा समावेश आहे. सदर प्रकल्प हा रक्कम रु. 1067.00 कोटीचा असुन, पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर विभागातुन 05 शेतकरी उत्पादक कंपन्या / फळे व भाजीपाला सहकारी संस्थांची निवड झालेली आहे. पहिल्या टप्प्यातील कोल्हापूर विभागातील शेतकरी उत्पादक कंपन्या / फळे व भाजीपाला सहकारी संस्था व खाजगी गुंतवणुकदारांचा प्रतिसाद पाहता, प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरु होणार असल्याने मॅग्नेट प्रकल्पांतर्गत सहभागी होणाऱ्या संस्थांसाठी मॅचिंग ग्रँट घटकांतर्गत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी दि. 25 व 26 जुलै 2022 रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर यांच्या सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर कार्यशाळेमध्ये पहिल्या दिवशी सहा शेतकरी उत्पादक कंपन्या, तीन माविम अंतर्गत महिला गट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी सात शेतकरी उत्पादक कंपन्या व तीन माविम अंतर्गत महिला गट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर कार्यशाळेस डॉ. सुभाष घुले, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक तथा उपसंचालक, मॅग्नेट प्रकल्प कोल्हापूर, श्री. आशुतोष जाधव, जिल्हा व्यवस्थापक, नाबार्ड कोल्हापूर, माविम, कोल्हापूरचे श्री. सचिन कांबळे, मॅग्नेट प्रकल्पाचे सल्लागार श्री. सुयोग टकले, कृषि पणन मंडळाचे श्री. मुकुंद फळे, श्री. प्रतिक गोनुगडे व श्री. सहर्ष साळुंखे उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये डॉ. सुभाष घुले यांनी मॅग्नेट प्रकल्पाचे प्रस्ताविक केले, के.पी. एम. जी. चे तज्ञ श्री. प्रितिश चौगुले, श्री. शरद मनोहर पंत, श्री. सोहम सिन्हा व श्री. सुरजित सिन्हा यांनी मार्गदर्शन केले.
श्री. प्रितिश चौगुले यांनी मॅग्नेट प्रकल्पाविषयी तसेच व्यवसाय आराखडा बनविण्या संदर्भात, श्री. सोहम सिन्हा यांनी मॅचिंग ग्रँट अंतर्गत पात्र व अपात्र घटकांबाबत तसेच काढणी पश्चात सुविधांसाठी अर्थसहाय्य संदर्भात, श्री. सुरजित सिन्हा यांनी पिकांसाठी मुल्य साखळ्या विकसित करणे व व्यवसायातील संधी व अत्याधुनिक तंत्रज्ञान संदर्भात तसेच श्री. शरद पंत यांनी अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे व शेतकरी उत्पादक संस्थांचा सहभाग वाढविणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बँक ऑफ इंडिया व समुन्नती फायनान्स कंपनी यांनी आर्थिक पुरवठा करणेबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रश्नोत्तराची चर्चा होऊन आभार प्रदर्शन श्री. मुकुंद फळे यांनी केले.