मुंबईच्या आझाद मैदानावरून दलित महासंघाची सिंह गर्जना मा.प्रा.मच्छिंद्र सकटे…..
सविस्तर असे की, दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मातंग समाज एकवटला होता. जय लहुजी, जय भारत असा नारा घेऊन समस्त मातंग समाज मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्र आला होता. दलित,शोषित, पीडित समाजाच्या परिवर्तनासाठी फुले, शाहू, आंबेडकर आणि सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मा. मच्छिंद्र सकटे साहेब यांनी केले .
दलित महासंघाच्या वतीने *ये आजादी झुठी है, देश की जनता भुखी है, या ऐतिहासीक घोषणेचा अमृत महोत्सव महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसीय महाधरणे आंदोलना द्वारे करण्यात आला.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देश सगळीकडे साजरा करत होता, परंतु मातंग समाज व इथला शोषित, गरीब, कष्टकरी, बेरोजगार, कामगार बहुजन समाज मात्र स्वतंत्र नव्हता म्हणूनच इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला शह देण्यासाठी 75 वर्षांपूर्वी याच आझाद मैदानावरून सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांनी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. या मोर्चाचा अमृत महोत्सव करण्यासाठी दलित महासंघ सज्ज झाला आणि दलित महासंघाच्या वतीने या आंदोलनाची पुनरावृत्ती म्हणजे 16 ऑगस्ट 2022 ला “दे धडक, बेधडक” अशा पद्धतीने मातंग समाजाच्या न्याय – हक्कासाठी महाधरणे आंदोलन घेतले .
आणि या आंदोलनाने अण्णा भाऊंच्या आंदोलनाचा, अण्णा भाऊंच्या विचारांचा अण्णा भाऊंच्या घोषणेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
दलित महासंघ ही संघटना गेली तीन दशकं मातंग समाजाच्या, बहुजनांच्या न्याय,हक्कासाठी रस्त्यावरची चळवळ करत आहे. क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे, महात्मा ज्योतिबा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रत्येक क्षेत्रातून प्रयत्न करत आहे. दलित महासंघाचे वादळ कोल्हापुरातून सुरू झाले आणि त्याचा झंझावात आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पहायला मिळत आहे.
दलित महासंघाचे सर्वेसर्वा, बहुजन समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजन ह्रदय सम्राट, दलित- कष्टकरी समाजाचे कैवारी मा.प्रा. डॉ.मच्छिंद्रजी सकटे यांच्या रूपाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळ तयार झाले आहे आणि या वादळाला संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाने पाठिंबा दिला आहे. दलित महासंघ नेहमीच आक्रमक,जहाल मोर्चे, आंदोलने, निदर्शने, उपोषणे करत आली आहे.
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या या महाधरणे आंदोलनासाठी बहुजन हृदय सम्राज्ञी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मा.प्रा. पुष्पलता सकटे, प्रदेशाध्यक्ष मा. काशिनाथ सुलाखे- पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, मा.नामदेव साठे, मा. सरोजनी सकटे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर बाबासाहेब दबडे, जिल्हा संघटक अशोक गायकवाड, कोल्हापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष धनाजी सकटे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, नगर जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, सांगली जिल्हाध्यक्ष (बीएसपी) बळीराम रणदिवे, नगर जिल्हाध्यक्ष शिवाजी बुलाखे (बी एस पी), ,मा. मंगल सोनवणे, मा. आशा सुलाखे पाटील आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य आणि उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता, हेच या आंदोलनाचे वैशिष्ट्य होते.