नंदुरबारात इतिहास.. डॅाल्बीशिवाय विसर्जन मिरवणुका
डॅाल्बीशिवाय मज्जा नाही’ या म्हणीला छेद देत नंदुरबार जिल्ह्यात पोलीसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॅाल्बीशिवाय गणपती विसर्जन मिरवणुका काढून मागास म्हणून गणल्या गेलेल्या आदिवासी जिल्ह्याने आपली वैचारिक व विधायक श्रीमंती दाखवली आहे.पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून नंदुरबार जिल्ह्यातील गणेश मंडळांनी विशेषतः तरुणाईने राज्यांत आदर्श घालून इतिहास घडविला आहे. विशेष म्हणजे गेली २ वर्षे कोरोनामुळे गणपती उत्सव साजरा झाला नसल्याने यंदा प्रंचंड उत्साह असतानाही डीजे किंवा डॅाल्बी न वाजवतां ढोल ताशे व पारंपारीक वाद्यांच्या गजरात जिल्ह्यात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. अर्थात नंदुरबार पोलिसांनी डॅाल्बीमुक्त नंदुरबार जिल्हा ही संकल्पना पूर्ण ताकदीने राबवली आणि लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला. जनतेवर अनावश्यक दडपशाही न करता कायद्याची पुरेपूर परंतु संयमाने अंमलबजावणी करतानाच समुपदेशन, प्रबोधन व उत्कृष्ट समन्वय या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी करुन दाखविला आहे. बहुतांश डॅाल्बीमालकांनी डॅाल्बी वाहनांच्या चाव्या स्वतःहून पोलीसांकडे सोपविल्या होत्या.यामुळे ‘इट हॅपन्स ओन्ली इन नंदुरबार’ अशी चर्चा सर्वत्र आहे.
डॅाल्बीमुक्त नंदुरबार जिल्हा हा उपक्रम सुरु करणारे नंदुरबारचे जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील यांनी मात्र याचे सर्व श्रेय त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेबरोबरच नंदुरबारच्या समस्त जनतेला दिले आहे.