नंदुरबार पोलीसांचा माणुसकीचा धर्म!अंत्यसंस्कारासाठी चार टन लाकडे दिली!!
इतकेच जाताना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते!
कवि सुरेश भटांच्या या ओळींच्या नेमका उलट प्रत्यय नवापूरात येत होता.
इतकेच जाताना सरणावर कळले होते,
जगण्याने केली सुटका मरणाने छळले होते!
गेल्या आठवडय़ापासून नवापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडेच नसल्याने स्मशानभूमीत आणलेले मृतदेह ताटकळत ठेवण्यात येत होते.मृतदेहांची हेळसांड होत असलेने मयतांच्या नातेवाईकांसोबतच नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत होता.प्रसारमाध्यमांतून याबाबत वृत्त समजताच नंदुरबारच्या जिल्हा पोलीसप्रमुखांनी नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना तातडीने हालचाल करण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस अधीक्षकांसह नवापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून सुमारे चार टन लाकडे उपलब्ध करून दिली आणि अंत्यसंस्कारासाठी खोळंबलेले मृतदेह मार्गस्थ झाले.नवापूर परिसरात लाकडे उपलब्ध नसल्याने लगतच्या गुजरात राज्यातून पोलीसांनी ही लाकडे उपलब्ध करुन दिली हे विशेष! नंदुरबार पोलिसांनी मानवाच्या अंतिम प्रवासादरम्यान असा वेगळा माणुसकीचा धर्म निभावला आहे.
पोलीसांतील या जिवंत माणुसकीचे दर्शन झाल्याने नवापूर परिसरातील मयताच्या नातेवाईकांनी साश्रू नयनांनी पोलीसांना धन्यवाद दिले आहेत. मात्र पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील,उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे या पोलीस टीमने हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले आहे.