विराथन बुद्रुक येथील अभिनव विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला वनभोजनाचा आस्वाद
प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
मेघराज शिक्षण संस्था संचालित अभिनव विद्यालय विराथन बुद्रुक येथील विद्यार्थ्यांचे वनभोजन नुकताच विठ्ठलवाडीच्या टेकडी जवळ असलेल्या मैदानावर अत्यंत उत्साहात पार पडले.
याप्रसंगी मेघराज शिक्षण संस्थेचे कार्यवाह चंदुलाल घरत उपस्थित होते. घरत यांनी सांगितले की, अभिनव विद्यालयामध्ये वेगवेगळ्या संकल्पना राबवून मुलांना निसर्ग आणि संस्कृतीची आवड कशी निर्माण होईल याकडे लक्ष दिले जाते. वनभोजनासारख्या उपक्रमामुळे विद्यार्थी निसर्गाशी संवाद साधताना दिसतात. या उपक्रमामुळे मुलांमध्ये कष्ट, स्वावलंबन व सामाजिक बांधिलकी यांची जोपासना होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कामनिष राऊत, प्रभाकर किणी, श्रीधर म्हात्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा किणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वनभोजनसाठी विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी चुलीवर स्वतः जेवण बनवले. बनवलेल्या जेवणाच्या आकर्षक अशा डिश तयार केल्या होत्या. इयत्ता पहिली ते पाचवीच्या लहान गटामध्ये बारा गट होते. तर इयत्ता आठवी ते दहावीच्या मोठ्या गटामध्ये सतरा गट होते. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक तर प्रत्येक गटातील तीन गटांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. वनभोजनाचा समारोप गीत गायनाने झाला.