यशवंत ग्लुकोज संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख कार्यकर्ता बैठक संपन्न.
शिराळा प्रतिनिधी
येथील यशवंत ग्लुकोज कारखाना संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक होते. माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक प्रमुख उपस्थितीत होते. रविवारी ता.१२ मार्च २०२३ रोजी वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजना भाग १ टप्पा ३ पंपगृह शिरसी बंदिस्त नलिका, पणुंब्रे तर्फ शिराळा बोगदा आणि पणुंब्रे तर्फ शिराळा उजवा व डावा बंदिस्त नलिका २ हजार ६७० हेक्टर लाभ क्षेत्राच्या ८६.६५ कोटी खर्चाच्या कामाचे भूमिपूजन समारंभ भव्य शेतकरी मेळावा होणार आहे. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटीलसाहेब तसेच माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या व माझ्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होईल. तत्पूर्वी कर्वे (ता. वाळवा) येथे वाकुर्डे बुद्रुक योजनेतून आलेल्या पाण्याचे पूजन, शिराळा येथील मांगले रस्त्यावर गोरक्षनाथ मंदिराजवळ २ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन, वाकुर्डे बुद्रुक येथे येथील भूमिपूजन हे कार्यक्रम संपन्न होतील. त्यानंतर टाकावे हायस्कुलच्या पटांगणावर दुपारी १:३० वाजता भव्य शेतकरी मेळावा संपन्न होईल. त्यासाठी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार नाईक व माजी जिल्हा परिषद सदस्य नाईक यांनी केले. यावेळी वाळवा प. स. माजी सभापती रविंद्रकाका बर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराज नलवडे, विश्वास कदम, बाळासाहेब पाटील, सुकुमार पाटील, यशवंत निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, बंडा नांगरे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, पिनू पाटील, पांडुरंग पाटील, शंकरराव पाटील आदी मान्यवर व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
―――――――――
कोंडाईवाडी (६० हेक्टर), शिरशी (८० हेक्टर), आंबेवाडी (२४ हेक्टर), अंत्री बुद्रुक (४० हेक्टर), निगडी (१४७ हेक्टर), औढी (२०० हेक्टर), पाडळेवाडी (१०१ हेक्टर), प. त. शिराळा (९० हेक्टर), शिवरवाडी (२२ हेक्टर), भैरवाडी (३३ हेक्टर), टाकावे (२५४ हेक्टर),बांबवडे (२५० हेक्टर), पाचुंब्री (३१३ हेक्टर), करमाळा (३२ हेक्टर), भटवाडी (११७ हेक्टर), सुरुल (१७० हेक्टर), ओझर्डे (१३५ हेक्टर), वाटेगाव (५९५ हेक्टर) एकूण १८ गावातील २ हजार ६७० हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. हे कामे मार्च महिन्यात सुरू होऊन वर्षभरात पूर्ण होईल. महाआघाडी सरकार असतानाच या कामांना निधी मंजूर करण्यात आला होता.