तनवीर पाटील यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार.
शिराळा प्रतिनिधी – ग्रामीण भागातील पालकांनी स्वतः आपला मुलगा किंवा मुलगी चांगल्या पदावर जावेत अशा परिस्थितीची धारणा करावी. असे मत माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.
भाटशिरगाव ता. शिराळा येथील तनवीर संपतराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात चौदाव्या क्रमांकाचे उत्तीर्ण होत डी. डी. आर. म्हणून निवड झाली. याबद्दल सत्कार प्रसंगी ते बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक, उप वनसंरक्षक राहुल पाटील, सत्यजित देशमुख, रणजितसिंह नाईक प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवाजीराव नाईक म्हणाले, ग्रामीण भागातील युवक युवती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होत आहेत हे अभिमानास्पद आहे. प्रथमतः तनवीरच्या कुटुंबांचे अभिनंदन की, त्यांनी हा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला. तरुणांना प्रेरणा देणारे असे हे चांगले चित्र दिसत आहे. ग्रामीण भागातील पालकांनी स्वतः आपला मुलगा, मुलगी चांगल्या पदावर जावे अशी धारणा करावी. तनवीर मुळे भाटशिरगावचे हे नवीन रूप पाहावयास मिळत आहे. इतर तरुण तरुणींनी यामधून प्रेरणा घ्यावी. ग्रामीण भागातील तरुण शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे येत आहे हि बाब अतिशय चांगली आहे.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, शिराळा सारख्या डोंगरी आणि ग्रामीण भागातील युवकांनी शेती किंवा खाजगी नोकरीच्या मागे न लागता शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा द्याव्यात. यातून मिळालेले यश कुटुंबाला आणि समाजाला प्रेरणा देणारे असते. काहीवेळा अपयश देखील येते मात्र खचून न जाता जिद्द ठेवावी आणि यशस्वी व्हावे.
स्वागत प्रास्ताविक सहदेव पाटील यांनी केले. यावेळी माजी सभापती सम्राटसिंह नाईक, बाजीराव देशमुख, प्रा. अनिल फाळके, संपतराव पाटील, संपत देशमुख, संपत देसाई, महादेव देसाई, गणेश आलुगडे, संजय देसाई, सर्जेराव देसाई, शिवाजी देसाई, विकास पाटील, राजेंद्र पाटील, तानाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार गणेश आलुगडे यांनी मानले.