खंडाळातील मुंबई पुणे महामार्गावर अपघातात कंटेनर धडकून रिक्षाचा चक्काचूर ; सुदैवाने जीवितहानी टळली
रिक्षाचालकासह तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी
लोणावळा : खंडाळातील मुंबई पुणे महामार्गावर अपघातात कंटेनर धडकून रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असली;तरी रिक्षाचालकासह तीन विद्यार्थीनी गंभीर जखमी झालेल्या आहेत.
लोणावळा महाविद्यालयात शिक्षणासाठी निघालेल्या तीन विद्यार्थीनी यांना घेवून ता.१ रोजी सकाळी वलवण कडे निघालेल्या आॕटोरिक्षाला क्रमांक एम.एच.१४ सी यु ६३४५ हीस मुंबईला जाणाऱ्या कंटेनर क्रमांक एम.एच.०४ यु ०७४१ ने जोराने पलटी होऊन धडकून अपघात झाल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला. त्यात आॕटोरिक्षाचे चालक रमेश दशरथ सपकाळ (वय-५०,रा-नेताजीवाडी , खंडाळा , ता-मावळ) , त्यांची मुलगी कु.सलोनी रमेश सपकाळ (वय-१८,रा-नेताजीवाडी , खंडाळा ) ,श्रूती संतोष दळवी (वय-१८,रा-नेताजीवाडी , खंडाळा )आणि सोनाली मोहन शितोळे (वय-२४,रा-नेताजीवाडी , खंडाळा ) असे चारही जण गंभीर जखमी झाले आहेत.
रिक्षाचा चालक व त्यांची मुलगी यांचेवर सरस्वती रूग्णालयात , तर दुसऱ्या दोघींवर खाजगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. या अपघाताबाबत लोणावळा शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींचे जबाब घेण्यात आज सायंकाळी पर्यत कुणीही फिरकले नसल्याचे जखमींचे नातेवाईक यांचेकडून आवाज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले . सकाळी घरून निघाल्यानंतर सुमारे दहा मिनिटांनी ८.२५ वाजता साठे मिसळसमोर हा कंटेनर पलटी होऊन रिक्षावर आदळून भीषण अपघात झाला. पुढील तपास लोणावळा शहर पोलिस करीत आहेत.