मावळातील टाकवे खुर्द शाळेतील विद्यार्थी कवींचे जिल्हा परिषदेने केले कौतूक
मावळ : तालुक्यातील लोणावळा शहराजवळील टाकवे खुर्द शाळा ही उपक्रमशील शाळा आहे.या शाळेचे मुख्याध्यापक संजय जगताप सर हे स्वतः कवी व लेखक आहेत.आपल्यातील कवित्वाचे गुण विद्यार्थ्यांमध्ये उतरावेत यासाठी त्यांनी आपल्या सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने अनेक प्रयत्न केले. टाकवे खूर्द शाळेत दर शनिवारी अवांतर वाचनाची पुस्तके विद्यार्थ्यांना देऊन त्यांनी वाचलेल्या भागाविषयी माहिती सांगण्यास सांगितली जाते.त्यातून छान माहिती सांगणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतूक केले जाते.त्यामुळे मुलांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.छोट्या मोठ्या वयानुरुप कविता वाचणासाठी उपलब्ध करुन दिल्या.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कविता वाचनाची तसेच लेखनाची आवड निर्माण झाली.
यातूनच अनेक मुलांनी कविता करण्यास सुरुवात केली.कवितेचा प्रारंभ,मध्य,शेवट तसेच यमकाचे महत्त्व जाणून अनेक विद्यार्थ्यांनी सुरेख कविता केल्या.याच शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पर्यावरण, शिक्षक, शाळा,माती इ.विषयांवरील कवितांचा “अक्षरधारा” हा काव्यसंग्रह पंचायत समिती मावळ येथे नुकताच प्रसिद्ध झाला.पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी सदरच्या कविता वाचून आनंद व्यक्त केला.खेड्यातील मुले ही कशातच कमी नाहीत हे या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून दिसून येते असे म्हणत त्यांनी टाकवे खुर्द शाळेचे कौतूक केले.
मावळातील मुलांच्या मराठी संवर्धनासाठी सुरु असलेल्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतूक होत आहे.