गोरक्षकांची सतर्कतेने, कत्तलीपासून वाचले दोन वासरांचे प्राण..
गोरक्षकांची सतर्कतेने, कत्तलीपासून वाचले दोन वासरांचे प्राण..Due to the alertness of the cow guards, the lives of two calves were saved from slaughter.
आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, १६ एप्रिल.
गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे कत्तलीपासून दोन गोवंशीय वासरांचे प्राण वाचले आहेत. गोरक्षकांनी वाहनाचा पाठलाग करून वरसोली टोलनाका येथे मोठ्या शिताफीने वाहन अडविले व एक प्रकारे या वासरांना जीवनदानच दिले. ही घटना शनिवारी (दि. १५) रोजी रात्रीच्या सुमारास मावळ तालुक्यात घडली.
•
रंजना शशिकांत तुपे (रा. तुपेवस्ती रावेत), तुकाराम श्रीमंत शिंदे (रा. ब्राम्हणवाडी, मावळ) व अन्य एक अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बजरंग दल प्रखंड सहमंत्री प्रतिक दिलीप गोसावी यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच अशा प्रकारे कुठेही गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्यास तत्काळ गोरक्षकांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांगोळी (ता. मावळ) येथून ही दोन गोवंशीय वासरे पिकअपमध्ये भरत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती. याची माहिती काल सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास बजरंग दलाचे कार्यकर्ते गणेश खरात यांनी फिर्यादी गोसावी यांना दिली. त्यानुसार हा पिकअप टेम्पो (MH 14 EM 2909) वलवण बाजुने जात असताना रेन्बो हॉटेल समोर दिसला. तो थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने हुलकावणी देत टेम्पो पळविला. मात्र त्याचा पाठलाग केला असता तो टेम्पो वरसोली टोलनाका येथे टोल भरायला थांबल्याने पकडण्यात आला.
दरम्यान, टेम्पो आडवताच दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ही वासरे आम्ही सांभाळायला घेऊन चाललो आहे असे सांगितले. मात्र तुमचा गोठा कुठे आहे, जनावरांची खरेदी पावती कुठे आहे असे विचारताच एकजण दुचाकीवरुन पसार झाला. यावेळी शिवदुर्गचे सुनिल गायकवाड व गोरक्षक रुपेश गराडे यांना बोलावून घेण्यात आले. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती घेत पिकअप टेम्पोसह दोन्ही वासरे ताब्यात घेतली आहेत. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.