डॉ. संभाजी मलघे लिखित ग्रंथाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते प्रकाशन ..
प्रसिद्ध लेखक व इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे लिखित 'डॉ. मनोहर जाधव व्यक्तिवेध आणि साहित्यममीमांसा ' या ग्रंथाचे प्रकाशन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले.
डॉ. संभाजी मलघे लिखित ग्रंथाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते प्रकाशन Dr. Publication of the book written by Sambhaji Malghe by director Nagraj Manjule
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर १९ जुन.
प्रसिद्ध लेखक व इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे लिखित ‘डॉ. मनोहर जाधव व्यक्तिवेध आणि साहित्यममीमांसा ‘ या ग्रंथाचे प्रकाशन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, साधनाचे संपादक विनोद शिरसाट, विज्ञान साहित्यिक प्रा. संजय ढोले, अभिनेते मिलिंद शिंदे, प्रा. राजाभाऊ भैलुमे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, की डॉ. मनोहर जाधव यांनी विद्यार्थ्यांना सहजपणे जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवले. त्यांच्या या तत्त्वज्ञानामुळे विद्यार्थ्यांना जगण्याचे समृद्ध बळ प्राप्त झाले. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे माझ्यासारखे असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य समृद्ध होत गेले.
डॉ. करमळकर म्हणाले, की मनोहर जाधव यांनी विद्यापीठात कायमच सहकार्याच्या भावनेने काम केले आहे. विद्यापीठात आंदोलन झाले की त्यांची प्रशासक म्हणून चांगली भूमिका असायची.
मिलिंद शिंदे म्हणाले, समाजाला नेहमीच चांगले काहीतरी देण्याचे काम डॉ. मनोहर जाधव यांनी केले आहे. त्यांनी शिकण्याची, लेखनाची, अभिनयाची आवड असणाऱ्यांना मोठे केले आहे.
मनोहर जाधव यांनी सांगितले, की मी लेखक, कवी, समीक्षक आहे. यापेक्षा मला शिक्षक व्हायला आवडते. शिक्षकाची भूमिका समाजात अत्यंत महत्त्वाची आहे. त्याची फलश्रुती दिसण्यासाठी आठ – दहा वर्षे जावे लागतात. शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना चांगले शिकवतात. मात्र, विद्यार्थी कर्तृत्ववान होण्यास शिक्षक नव्हे, तर विद्यार्थी कारणीभूत असतात. विद्यार्थ्यांनी कायम समाज वाचण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
यावेळी डॉ. पंडित विद्यासागर, शिरसाट यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजाभाऊ भैलुमे यांनी, तर आभार डॉ. संभाजी मलघे यांनी मानले.