खुनाची पाच कारणे म्हणजेच मुद्दाम हून पसरवलेले राजकारण…योगेश पारगे
खुनाची पाच कारणे म्हणजेच मुद्दाम हून पसरवलेले राजकारण…योगेश पारगे.Five Reasons for Murder i.e. Deliberate Politics… Yogesh Parge.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १८ जुलै.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष. स्वर्गीय किशोर आवारे यांच्या खुना मागील पाच कारणे म्हणजे मुद्दामून पसरवलेले राजकारण आहे, तसेच अशा बातम्या पेरून एखाद्या व्यक्तीच्या मनात राग निर्माण करणे हे खुनाच्या कटात सामील होण्या इतकेच गंभीर आहे. स्वर्गीय किशोर आवारे यांच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूनंतर देखील गैरसमज पसरवून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत ते थांबवण्याचे आवाहन योगेश पारगे यांनी केले आहे.
१) आरोपींच्या जमिनीचा ताबा.
स्वर्गीय किशोर आवारे यांनी आरोपींच्या जमिनीचा ताबा घेतल्यामुळे सदर प्रकार घडला असल्याची चर्चा रंगवण्यात येत आहे, परंतु किशोर आवारे यांनी कुठल्याच जमिनीचा ताबा घेतलेला नाही . जर याबाबत माहिती खरी असेल तर तळेगाव पोलीस स्टेशन येथे त्याबाबत अर्ज करण्याची विनंती योगेश पारगे यांनी केली आहे. असा कुठलाही ताबा किशोर आवारे यांनी घेतला नाही व त्याची त्यांना उभ्या आयुष्यात गरजही लागली नाही, त्यामुळे सदर माहिती खोटी असून अप-प्रचार करणारी आहे.
२) बांधकाम साईट बंद केल्याचे प्रकरण.
किशोर आवारे यांनी स्वतः बांधकाम साईट बंद केली असा अपप्रचार करण्यात येत आहे तरी किशोर आवारे यांनी कुणाचीही बांधकाम साईट बंद केलेली नाही, पोलीस तपासात देखील तसे निष्पन्न झालेले मला तरी आढळून आले नाही , जर हा प्रकार खरा असेल तर तळेगाव पोलीस स्टेशन येथे अर्ज करावा त्यामुळे सत्यता काय आहे हे किशोर आवारे यांच्या नंतर तरी समाजाला कळेल.
3) वृक्षतोडीचे प्रकरण.
कृष्णा आकार सोसायटी मागील ओढ्या लगत असणाऱ्या ग्रीन झोन बेल्ट मधील काही वृक्ष नगर परिषदेच्या माध्यमातून तोडण्यात येत असल्याची लिखित तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन देशपांडे यांनी नगर परिषदेमध्ये केली होती त्याची शहानिशा करण्यासाठी जनसेवा विकास समितीचे कार्यकर्ते काही पत्रकारांच्या माध्यमातून व किशोरभाऊ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेट देऊन आले होते. सदर प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या संदर्भातील तक्रार अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आला होता.त्याबद्दल लिखित तक्रार किशोर आवारे यांनी केलेली नाही, तसेच किशोर आवारे यांना नगरपरिषदेमध्ये सुनावणीसाठी सुद्धा कधीही बोलावलेले नाही त्यामुळे सदर पेरलेली बातमी धाधांत खोटी आहे.
४) टोलनाक्यामुळे घडलेला वाद.
किशोर आवारे यांनी सोमाटणे टोलनाका बंद व्हावा यासाठी जन आंदोलन पुकारलेले होते. सोमाटणे येथील टोलनाका मावळकर नागरिकांना मोफत व्हावा, एवढाच त्यातील हेतू होता. सोमटणे टोल नाका येथील जागा बदलण्यात यावी यासाठी किशोर आवारे प्रयत्न करत होते कारण सध्याची जागा ही अत्यंत दाट वस्तीची असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या तळेगावकर नागरिकांना भेडसावत होती. त्यामागील प्रामाणिक हेतू हा अगदी स्पष्ट होता. अनेक रुग्णांना या वाहतुकीच्या समस्येमुळे प्राण गमवावे लागले ही वस्तुस्थिती आहे .टोल नाका इतर ठिकाणी हलवावा एवढीच मागणी स्वर्गीय किशोर आवारे यांच्याकडून करण्यात आली होती त्यामुळे त्या ठिकाणी सुरू असणारे कुणाचे कॉन्ट्रॅक्ट काढून घ्यावे किंवा कुणालाही आर्थिक झळ पोहचवावी अशी किशोर आवारे यांची कधीही इच्छा नव्हती, कुणाच्याही कॉन्ट्रॅक्ट मध्ये हस्तक्षेप टोल नाक्या संदर्भात किशोर आवारे यांनी केलेला नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टच्या आड येणं ही सुद्धा बातमी खोटी आहे त्यामुळेच संबंधितांच्या डोक्यात राग उत्पन्न झाला असावा असं स्पष्ट अंदाज आहे, त्यामुळे सदर बातमी मुद्दामहून पसरवण्यात आलेली आहे हे स्पष्ट होत आहे.
५) खाऊ गल्ली बंद करण्यासाठी प्रयत्नशील.
खाऊ गल्ली बंद करण्यासाठी स्वर्गीय किशोर आवारे प्रयत्न करत आहेत ही बाब खोटी आहे. किशोरभाऊ यांनी उभ्या आयुष्यात खाऊ गल्लीकडे ढुंकूनही पाहिलेले नाही, कुणाचा व्यवसाय बंद पडावा असे किशोर आवारे यांना कधीच वाटलेले नाही, तसा त्यांनी प्रयत्न देखील केलेला नाही, एवढ्या शूद्र मनोवृत्तीचे किशोर आवारे कधीच नव्हते, त्यामुळे सदर पेरलेले कारण हे धादांत खोटे आहे व दिशाभूल करणारे आहे.
सदर सर्व कारणे अत्यंत शुल्लक व चर्चेअंती मिटणारी होती त्यासाठी एवढ्या टोकाची भूमिका घेणे योग्य नसल्याचे पारगे यांनी व्यक्त केले आहे. आज शुल्लक रागामुळे दोन कुटुंब उध्वस्त झालेली आहेत, तरुण रागाच्या भरात आपल्या आयुष्यातील ध्येय विसरून बसलेले आहेत, त्यामुळे स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे खूपच गरजेचे आहे व अपप्रचाराला बळी न जाता चर्चेने मार्ग निघू शकतात असे पारगे यांनी नमूद केले आहे.
स्वर्गीय किशोर आवारे जनसेवक होते, त्यांच्या कार्याची प्रचिती गगनाला भिडलेली होती, त्यामुळे राजकीय प्रतिमा मलिन व्हावी हाच त्यामागील दृष्टिकोन असावा असा अंदाज योगेश पारगे यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवून एखाद्याच्या मनात राग उत्पन्न होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळेच स्वर्गीय किशोर आवारे यांच्या बाबतीत घात झाला असावा असा अंदाज पारगे यांनी व्यक्त केला आहे.