आम्हाला फक्त शिकवू द्या’ हे म्हणण्याची वेळ ज्या दिवशी संपेल तो दिवस सर्व शिक्षकांसाठी खरा शिक्षक दिन असेल.’
गुरुजी या शब्दाची सर.....सर,टीचर या शब्दाला नाही.
‘आम्हाला फक्त शिकवू द्या’ हे म्हणण्याची वेळ ज्या दिवशी संपेल तो दिवस सर्व शिक्षकांसाठी खरा शिक्षक दिन असेल.’
गुरुजी या शब्दाची सर…..सर,टीचर या शब्दाला नाही.
आवाज न्यूज : विशेष लेख, श्रावणी कामत, ५ सप्टेंबर.
” गुरुब्रम्हां गुरुविष्णू,गुरुदेवो महेश्वरा|
गुरू साक्षात परब्रम्ह,तस्मै श्री गुरवे नमः|”
आज शिक्षक दिन…देशातील सर्व गुरूंना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..
आम्ही प्राथमिक शाळेत होतो तेव्हा गुरूंना सर्वजण ‘गुरुजी’ म्हणायचे.गुरुजी या शब्दात आई सारखी माया होती.त्यावेळी शहरातील, गावातील लोक गुरूंना आदर द्यायचे.सर्व कार्यक्रमात गुरूंचा सल्ला घ्यायचे.गुरुजी म्हणतील तसे असे समीकरणच होते.गुरुजींची आम्हाला आदरयुक्त भीती वाटायची.गुरुजींची सायकल,गाडीचा आवाज आला तरी आम्ही गुपचूप बसायचो.गुरुजी त्यावेळी आम्हाला रोज दुपारी गणित शिकवायचे.गणित चुकल्यावर मार असायचा तो मार आजही आठवतो.मारलेल घरी सांगितले तर घरचे पण मार द्यायचे.शिक्षा असायची पण चांगल्यासाठी.त्यावेळी गुरुजींना सतत प्रशिक्षणे, मिटिंग,सर्वेक्षणे नव्हती व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन नव्हतं.महिना अखेरलाच काम असायचं.त्यावेळी इंग्लिश मिडीयम च फॅड नव्हतं.जास्त शाळा नव्हत्या…पण सर्व मुले शिक्षणाच्या प्रवाहात होती.व्यावहारिक शिक्षण मिळायचे ते आज खूप गरजेचं आहे.परीक्षा असायच्या,नंबर मुळे मुले अभ्यास करायची..पास नापास व्हायच किती आनंद.आज देखील आमचे गुरुजी दिसले तरी आदरयुक्त भीती वाटते. खरच त्यावेळी असणारे गुरू व आज चे सर यात फरक आहे.
आज खूप शाळा झाल्या,गुरुजींचे सर,मॅडम चे टीचर झाले पण शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला.आज शिक्षकांना शिकवण्यापेक्षा इतर कामे जास्त आहेत.कामाची यादी काढली तर दिवाळी च्या बाजारापेक्षा जास्त मोठी यादी होईल.इच्छा असूनपण मुलांना अपेक्षित वेळ देता येत नाही म्हणून शिक्षकांचं मन तुटत असते.त्यावेळी शिक्षकांना असणारा मान, त्यांचं महत्व सर्व कमी झालं आहे.समाजातील अनेकांना शिक्षकांचा पगार दिसतो पण ती नोकरी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न,अभ्यास, त्यांचा कुटुंबातील लोकांनी केलेले परिश्रम त्यांना दिसत नाहीत.गुरुजींना पण कुटुंब असते हे विसरता कामा नये.
आज शिक्षकदिन आजपासून सर्व गुरूंना योग्य तो मान मिळावा एवढीच अपेक्षा.काही गुरू चुकत असतील तर त्यांना सांगा.आजच्या शिक्षक दिनापासून सर्व अशैक्षणिक कामे बंद व्हावीत एवढीच अपेक्षा.गुरुजींवर पुन्हा ‘आम्हाला फक्त शिकवू द्या’ हे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नये.
पुन्हा एकदा सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..
………भारत पोपट ननवरे.
उपशिक्षक,जि.प.प्राथमिक शाळा कौठळी,ता.इंदापूर, जि.पुणे
कोषाध्यक्ष, शिक्षक समिती, इंदापूर.