राज्यात थंडी वाढणार तर उत्तर भारतात पावसाचा प्रकोप; पुढील काही दिवस असे असेल हवामान
राज्यात पुढील काही दिवस थंडीत वाढ होणार आहे. तर उत्तर भारतातील बहुतांश राज्यात पावसाची शक्यता आहे. राज्यात हवामान कोरडे राहण्यासोबत ढगाळ हवामान राहणार आहे.
महाराष्ट्र : एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तानवर आहे. त्याच्या प्रभावामुळे एक हवेची चक्रीय स्थिती मध्य पाकिस्तानवर आहे. उत्तर भारताच्या वरील भागात एक तेज जेट स्ट्रीम असल्याने याचा परिमाण राज्याच्या हवामानावर होणार असून पुढील काही दिवस थंडीत वाढ होणार आहे. तर उत्तर भारतातील बहुतांश राज्यात पावसाची शक्यता आहे. राज्यात हवामान कोरडे राहण्यासोबत ढगाळ राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुण्यात थंडीत होणार वाढ
पुणे व परिसरातील पुढील पाच ते सात दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहील. १९ ते २० फेब्रुवारी पर्यंत वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. पुढील ७२ तासात सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. पुढील ७२ तासात किमात तापमानात घट होणार नाही. परंतु २१ पासून पुढील तीन-चार दिवस आकाश निरभ्र राहणार आहे. तर उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात ३ ते ४ डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्याच सोबत कमाल तापमानात दोन डिग्री सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.
राज्यात तापमानात वाढ
महाराष्ट्रातील तापमाना सध्या वाढ होऊ लागली आहे. राज्यातील काही भागात थंडी कमी झाली असून अनेक ठिकाणी दुपारच्या वेळी कडक ऊन पडत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही भागात कडक ऊन असेल. तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रविवारी अकोल्यात सर्वाधिक ३६.८ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. पुण्यात सर्वांत कमी १५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. ढगाळ वातावरण कमी झाल्यामुळे आकाश निरभ्र आहे. परिणामी उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. यवतमाळमध्ये ३६.२ तर वर्ध्यात कमाल तापमान ३५.० अशांवर होते. नांदेडमध्ये ३५.८, परभणीत ३६.५, तर उत्तर महाराष्ट्रात जळगावात, मालेगावात ३६.२. मध्य महाराष्ट्रातील सांगलीत ३५.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.