माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज पहाटे त्यांचे निधन झाले
मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. दोन दिवसांपूर्वी जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयात जोशी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ नेते मनोहर जोशी ही कट्टर शिवसैनिक होते. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. ते १९९५ साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी स्वीकारली. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं. त्यांनी या काळात मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशी विविध पदे भूषवली.
मनोहर जोशी हे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. तर, तीन वेळा विधानपरिषद सदस्य झाले. १९९५- १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवले. त्यानंतर १९९९- २००२ दरम्यान त्यांनी केंद्रात अवजड उद्योगमंत्री म्हणून काम पाहिले. पुढे २००२ मध्ये ते लोकसभा अध्यक्ष झाले.
२००६- २०१२ दरम्यान ते लोकसभेचे अध्यक्ष होते. मनोहर जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून मास्टर्स ऑफ आर्ट्स आणि एलएलबी पदवी प्राप्त केली. त्यांनी १४ मे १९६४ रोजी अनघा जोशी यांच्याशी विवाह केला, त्यांना एक मुलगा उन्मेष आणि अस्मिता आणि नम्रता या दोन मुली आहेत. त्यांची नात शर्वरी वाघ हिने २०२१ मध्ये आलेल्या बंटी और बबली २ चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.