जनसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा पत्रकार नितिन शिंदे
प्रतिनिधी-लक्ष्मण राजे
मुंबई:- पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो.जनता अन् सरकार यातील दुवा म्हणून भूमिका बजविण्याची जबाबदारी वृत्तपत्राला करावी लागते.जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडून ते सरकार दरबारी पोहोचविणे आणि सरकार तर्फे घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आदी तत्सम कामे वृत्तपत्रे व त्यांचे पत्रकार तनमनधनाने करत असतात.त्यामुळेच पत्रकारिता क्षेत्रातील घटकांना लोकशाहीत अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे.थोडक्यात चेक अँड बॅलन्स ची नि:पक्षपाती भूमिका वृत्तपत्रांना बजवावी लागते.वृत्तपत्र हे लोकशिक्षण व जनजागृतीचं प्रभावी माध्यम असते,त्याचा अचूक प्रयोग करावा,हा बहुमूल्य संदेश लोकमान्य टिळकांनी पत्रकारांना दिला.त्या पार्श्वभूमीवर तरुण आव्हान या मराठी साप्ताहिकाचे संपादक नितिन शिंदे हे समाजातील शेवटच्या माणसाला पत्रकारितेचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्याचं सामाजिक उत्तरदायित्व इमानेइतबारे पार पाडत आहेत,याचा आम्हा पत्रकारांना सार्थ अभिमान आहे.पत्रकारितेचं व्रत निष्ठेनं पाळणारे संपादक -पत्रकार श्री.नितिन मनोहर शिंदे यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्त त्यांना समस्त संपादक – पत्रकारांतर्फे हार्दिक शुभेच्छा.नितिनजी यांना आरोग्यदायी असं उदंड आयुष्य लाभो,हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना! तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून जनसेवा करतांना मोडेल पण वाकणार नाही हा बाणा जपून,कोणत्याही राजकीय दबावाला भीक न घालता,नितिनजी हे पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत आहेत,ही गोष्ट पत्रकारिता क्षेत्राला भूषणावह आहे.जनतेच्या हिताचं काय अन् मारक काय,याचं वास्तव चित्र जनमानसासमोर मांडण्याचं काम ते पत्रकार म्हणून सन २००५ पासून सातत्याने करत आहेत अन् भविष्यातही करतील,याचा आम्हा पत्रकारांना ठाम विश्वास आहे.प्रारंभीच्या काळात त्यांनी दैनिक मी सुधारक चे संपादक श्री.प्रमोद इंगळे यांच्या सानिध्यात रहात पत्रकारितेचे धडे गिरवून त्यांच्या पत्रकारितेतल्या प्रगल्भ ज्ञानाचा लाभ घेतला.त्यानंतर चिकाटी व कठोर परिश्रमाने शून्यातून विश्व निर्माण करण्याचा त्यांनी विडा उचलला,हे खचितच कौतुकास्पद आहे.एवढं करून नितिनजी थांबले नाहीत. उसंत,विश्रांती,विसावा ह्या गोष्टी त्यांच्या शब्द कोषात नाही.आराम हराम है हे पंडित नेहरू यांचे ब्रीद त्यांनी जणू अंगिकारले आहे,असे वाटते.मराठी साप्ता. तरुण आव्हान आणि न्यूज मराठी बाणा चॅनल चालवत त्यांनी सामाजिक वसाही घेतला. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ( ठाणे जिल्हा व कोंकण विभाग)आणि कल्याण(पू.)येथील आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष व समाज सेवक श्री.जितेंद्रसिंग पाटील-राजपूत यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे व अन्य ठिकाणी नेत्र चिकित्सा,मोफत चष्मा वाटप, मोतीबिंदू ऑपरेशन,मधुमेह तपासणी, हृदयरोग,रक्तदाब तपासणी करण्यासाठी दरवर्षी आरोग्य शिबिरे आयोजित करतात.सत्कारमूर्ती नितिन शिंदे यांनी पत्रकारितासह विविध मार्गांनी स्वतःला समाज कार्यात झोकून घेतलं आहे.त्यांची ही समर्पित रुग्णसेवा इतरांसाठी पथदर्शक ठरेल,हे निश्चित.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पुढे जाऊन त्यांनी राजकारणातून समाजकारण करण्याच्या प्रांजळ उद्देशाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ओवळा-माजिवडा मतदार संघातून बहुजन विकास आघाडी पक्षातर्फे निवडणूक लढविली.परंतु लोकसेवेची दाट इच्छा असूनही राजकारणाचे पिंड नसणं आणि मनी पॉवरचा अभाव असल्याने त्यांना या निवडणुकीत अपयश आलं.पण हे अपयश त्यांनी खिलाडीवृत्तीने स्वीकारला.कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते,हे त्यांना चांगल्या प्रकारे ज्ञात आहे.असो! कुठलीही स्पर्धा असो,त्यात यश-अपयश हे असतेच.त्याला दुसरा पर्याय नाही.अत: नितिन शिंदे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा! नितिन शिंदे हे सन २००३ पासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.पुढे त्यांनी २०१९ साली सदर पत्रकार संघाचे ठाणे शहर अध्यक्ष पद भूषवून संघाची सर्वदृष्टीने व्याप्ती वाढविली.त्यानंतर त्यांच्या प्रामाणिक व कठोर परिश्रमाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.श्री.वसंत मुंडे अन् प्रदेश सरचिटणीस मा.श्री.विश्वासराव आरोटे यांनी नितिन शिंदे यांना सन २०२० पासून कोंकण विभागाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविली.या संधीचं सोनं करून शिंदे यांनी ठाणेच्या गडकरी रंगायतन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.उदा. जागतिक महिला दिन साजरा करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करणे,पत्रकार दिनी उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या पत्रकारांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करणे,पत्रकारांना मेडिकल हेल्थ कार्ड देणं,पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे आदी कार्यक्रम नितिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित करण्यात येत आहेत.महत्वाचे म्हणजे ठाणे जिल्हा अन् कोंकण विभागीय म.रा.म.पत्रकार संघाने कठोर परिश्रम घेऊन ठाण्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे १६ वे राज्यस्तरिय अधिवेशन शंभर टक्के यशस्वी करून दाखविले.खरं तर,नितिन शिंदे यांच्या कुशल नेतृत्व गुणांची हे फलित आहे,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.नितिन शिंदे यांना विविध क्षेत्रांत काम करण्याची गोडी असून,*ते* राज्यव्यापी वाहतूक मालक चालक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ; मराठी बाणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ; महाराष्ट्र नॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष ; योगेश्वर कंप्युटर इन्स्टिट्यूटचे प्रोप्रायटर,नितस्मित क्रिएशन प्रा.लि.चे संचालक आदी संस्थांचे पदाधिकारी आहेत.कठोर परिश्रम,नेतृत्व कौशल्य,सचोटी,धडाडीवृत्ती, प्रामाणिकपणा, कार्यतत्परता, निडरता,सकारात्मक दृष्टिकोन या अष्टपैलू गुणवत्ते मुळे नितिन शिंदे हे सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत.याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! नितिन शिंदे यांच्या कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचं झालं तर,त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९८२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडीवली या गावी शिंदे परिवारात झाला.त्यांच्या वडिलांचं नाव मनोहर तुकाराम शिंदे तर,आईचं वंदना मनोहर शिंदे.या शिंदे दांपत्याचा तीन सुपुत्र अन् तीन कन्या असा परिवार आहे.नितिन यांचे माध्यमिक शिक्षण मानपाडा-ठाणे येथील संकेत विद्यालयात झालं,तर बी. कॉम तसेच डिप्लोमा इन कॉमप्युटर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर हे उच्च शिक्षण ठाणे येथील माजिवडा कॉलेजमध्ये झालं.त्यांची पत्नी सौ.सोनाली नितिन शिंदे ह्या एका खाजगी कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. तर, सुपुत्र कु.प्रणय नितिन शिंदे हा माध्यमिक शिक्षण घेत आहे.त्यांचे धाकटे बंधू श्री.देवेंद्र मनोहर शिंदे हे देखील पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून,त्यांचा कन्स्ट्रक्शनचाही व्यवसाय आहे,तर थोरले बंधू श्री.सचिन मनोहर शिंदे हे बान्सबारा सायटेन्स लि.कंपनीत नोकरीला आहेत.तर सौ.विद्या शिंदे,सौ.दक्षा शिंदे ,सौ. शशिकला शिंदे ह्या तिन्ही भगिनी सुखा-समाधानाचं आनंदमय असं वैवाहिक जीवन जगत आहेत.दरम्यान सन २०१३ मध्ये वडिलांचे आकस्मिक निधन झाल्याने साऱ्या परिवाराला जबर मानसिक धक्का बसला.तथापि स्वतःला सावरुन मोठ्या धैर्याने तिन्ही भावंडांनी आपल्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी घेतली.आता शिंदे परिवारातील प्रत्येक सदस्य आपापली जबाबदारी तनमन धनाने व्यवस्थितपणे पार पाडत उन्नतीच्या मार्गाने वाटचाल करत आहे.त्यांनाही आम्हा पत्रकारांतर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! पत्रकारांनी आपल्या नितिमत्तेला बाधा पोहोचू न देता,सत्याची कास धरून पत्रकारिता केली पाहिजे.तसेच जनसामान्यांना सहजपणे समजू शकतील,अशा वस्तूनिष्ठ बातम्या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध कराव्यात,म्हणजे या क्षेत्राचे महत्त्व कायमस्वरुपी टिकून राहील,असा मोलाचा संदेश घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारिता क्षेत्रातील सदस्यांना दिला.त्याचप्रमाणे समाजातील विविध जाती- धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या बातम्या अजिबात छापू नयेत,उलट त्याजागी धर्म व जातींमध्ये सदभाव,बंधुभाव व एकता कायम राखण्यासाठी पत्रकारांनी सदैव प्रयत्नशील रहावे,असं आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं.ही सर्व आदर्श मूलभूत तत्वे पत्रकार म्हणून नितिन शिंदे यांनी आत्मसात केली असून थोर लेखक,संपादक,साहित्यकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रामाणिक राहून *ते* पत्रकारिता क्षेत्रात आगेकूच करत आहेत.ही स्तुत्य बाब असून,वंदनीय घटनाकारांना खरी आदरांजली आहे.पत्रकारिता करताना शिंदे यांनी आपल्या तत्वांशी कधीच तडजोड केली नाही.त्यामुळे त्यांना कधी कधी आर्थिक नुकसानीला सुद्धा सामोरे जावे लागले.परंतु त्याची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही.केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून पत्रकारिता न करता,सामाजिक प्रबोधन व जनजागृतीसाठी ते निरंतर प्रयत्नशील राहिले आहेत.त्यामुळे त्यांच्या या पारदर्शक पत्रकारितेला ठाणे, पनवेल,नवी मुंबईतल्या सर्वधर्मीय लोकांनी व्यापक प्रमाणात प्रतिसाद दिल्याने तरुण आव्हान या त्यांच्या वृत्तपत्राने अन् न्यूज मराठी बाणा या चॅनलने जनमानसात मानाचं स्थान प्राप्त केलं,याचा पत्रकार म्हणून आम्हाला मनस्वी आनंद होतो.मराठी पत्रकारितेचे निर्माते,दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे संपादक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ; केसरी-मराठा चे संपादक लोकमान्य टिळक ; मुकनायक,बहिष्कृत भारत,प्रबुद्ध भारत,जनता या वृत्तपत्रांचे संपादक घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या त्रय आद्य संपादकांनी पत्रकारिता या पवित्र क्षेत्रासाठी जी आदर्श ध्येय धोरणे आखून दिली आहेत,त्यांचे तंतोतंत पालन करून तरुण आव्हान अन् न्यूज मराठी बाणाचे मुख्य समूह संपादक श्री.नितिन शिंदे यांनी पत्रकारितेची बूज मजबूत राखली आहे.आर्थिक फायद्याच्या हेतूनं केवळ जाहिरातींना थारा न देता,शिंदे हे आपल्या वृत्तपत्रात नेहमी वाचनीय मजकुराला अधिकाधिक जागा(स्पेस) देतात, जेणेकरून वाचकांना नित्यनेमाने जास्तीत जास्त लोकोपयोगी बातम्या वाचण्यासाठी मिळू शकतील.पत्रकारितेचं पावित्र्य अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून पितपत्रकारिता,चारित्र्यहनन,पेड न्यूज,प्रक्षोभक लेखन करणं या असभ्य अन् घातक गोष्टींपासून नितिन शिंदे यांनी आपल्या वृत्तपत्राला कोसो दूर ठेवलं आहे.समाजाचं आपल्याला देणं आहे या भावनेतून गोरगरीब, निराधार,गरजू घटकांच्या रोटी,कपडा, मकान,शिक्षण,रोजगार व आरोग्य या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचा फोडून त्याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.पत्रकार म्हणून नितिन शिंदे हे आई – वडिलांचे आशिर्वाद आणि आपल्या कृतिशील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल करताहेत,ही गोष्ट वाखाणण्याजोगी असून, मनाला दिलासा देणारी आहे.नितिन शिंदे यांना वाढदिवसाच्या पुनश्च हार्दिक शुभेच्छा! पत्रकारिता व अन्य आवडीच्या क्षेत्रांत त्यांना मोठं सुयश प्राप्त होवो,हीच आमची सदिच्छा! जय महाराष्ट्र!
लेखक : रणवीर राजपूत
गवर्नमेंट मीडिया,म.शा.मंत्रालय,