महाराष्ट्राच्या ५५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची यशस्वी सांगता
मुंबई – ‘‘ईश्वरीय इच्छेला सर्वोपरी मानण्यातच निखळ शाश्वत आनंद लपलेला आहे.” असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्रातील ५५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सांगता समारोहात केले. सद्गुरु माताजींच्या या आशीर्वचनांद्वारे तीन दिवसीय संत समागमाची यशस्वीरित्या सांगता झाली.
व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आलेल्या या संत समागमाचे थेट प्रक्षेपण मुंबईतील चेंबूर नाक्यावरील सत्संग भवनातून मिशनची वेबसाईट व साधना टी.वी.चॅनलवर करण्यात आले.ज्याचा आनंद जगभरातील भाविक भक्तगणांनी घेतला. आनंदाच्या अवस्थेवर प्रकाश टाकताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की जेव्हा आपण ईश्वराशी नाते जोडून त्याच्याशी एकरूप होऊ लागतो तेव्हा भक्तीचा असा काही रंग चढतो,की आम्हाला निरंतर आनंदाची अनुभूती प्राप्त होते. या आनंदामध्ये भक्त अशाप्रकारे तल्लीन होतो की, मग त्याच्यावर कोणाच्या वाईट बोलण्याचा अथवा दुर्व्यवहाराचा प्रभाव पडेनासा होतो. कारण भक्तीद्वारे त्यांने शाश्वत आनंदाची अवस्था प्राप्त केलेली असते. जीवनात एकरस अवस्था तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण अखंड एकरस राहणाऱ्या या निराकार प्रभुशी पूर्णपणे जोडले जातो. एका लोकोक्तिच्या माध्यमातून जीवनाच्या स्थितीचे वर्णन करताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की ‘दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई’ अर्थात दु:खद अवस्थेमध्ये सर्वांना देवाची आठवण होते. मात्र सुखात असताना तो ईश्वराच्या प्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त करायला विसरतो. सुख आणि दु:ख हे तर जीवनाचे महत्वाचे पैलु आहेत. ते जीवनात येतच राहणार; परंतु भक्त जेव्हा भक्तीच्या रंगात रंगलेला असतो तेव्हा तो क्षणोक्षणी आनंदाची अनुभूती घेत असतो आणि प्रभुच्या इच्छेमध्ये राहून सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारतो. त्यामुळे मग दु:ख आले तरी तरी तो दु:खी होत नाही.