ज्ञान हे सामाजिक शक्तीचे उगमस्थान…… प्रा. डॉ. महेश मोटे
मुरूम, ता. उमरगा, ता.२७ (प्रतिनिधी)
शिक्षण माणसाला संस्कारक्षम बनविते आणि संस्कारक्षम व्यक्तीचे गुण कर्माने श्रेष्ठ बनतात. शिक्षण समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे साधन असून या शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन होऊ शकते. माणसाला पशुत्वापासून मनुष्यत्व मिळवून देणारे एक प्रभावी अस्त्र म्हणजे शिक्षण होय. ज्ञान हे सामाजिक शक्तीचे उगमस्थान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंतीचे औचित्य साधून सिध्दार्थ कॉलनीच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार व व्याख्यान रविवारी (ता.२६) रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्मचारी धर्मभूषण राम कांबळे होते. पुढे बोलताना डॉ. मोटे म्हणाले की, पीडित वंचितांना सामाजिक न्याय मिळावा म्हणून शाहू महाराजांनी प्रतिकुल काळात प्रयत्न केले. यावेळी उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती अँड. राजासाहेब पाटील, भाजपच्या जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू मिनियार, बसव प्रतिष्ठाणचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे, कंटेकूरचे मुख्याध्यापक कमलाकर मोटे, सहशिक्षक संतोष कांबळे, गुलाब डोंगरे, संजय सावंत, राम डोंगरे, ज्ञानेश्वर पाटील, शिंदे, नदाफ आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राजासाहेब पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साक्षी कांबळे (बारावी),
गणेश कांबळे (दहावी),
दिव्यकृपा गायकवाड, दिक्षा कांबळे, अभिजित कांबळे, अमेय कांबळे, हर्षल सोमवंशी, रोहित डोंगरे, मुबाशशीरा नदाफ, अस्मिता गायकवाड, दिशा गायकवाड आदींचा मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
इम्रान सय्यद, आकाश बनसोडे, अतुल वाघमारे, अभिजित कांबळे, गौरव कांबळे, सुनीता कांबळे, सुजाता कांबळे, अभिषेक गोटमुकले आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. पुढे बोलताना डॉ. मोटे म्हणाले की, पीडित, वंचितांमध्ये सामाजिक परिवर्तन, शोषणमुक्त समाज निर्मिती, मानवी मूल्याचे संगोपन, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शैक्षणिक चळवळीस प्रोत्साहन, मोफत शिक्षणाचा कायदा, वस्तीगृह चळवळ व्यापक स्वरूपात बनवली एकूणच सामाजिक न्याय मिळावा म्हणून शाहू महाराजांनी त्यावेळी प्रयत्न केले. महाराजांच्या विचारांचा लेखाजोखा यावेळी मांडतांना त्यांनी जीवनपट विद्यार्थ्यांसमोर ठेवला. यावेळी राजासाहेब पाटील, राजू मिनियार, कमलाकर मोटे, रामलिंग पुराणे आदींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना राम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या जयंतीचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार अजिंक्य कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन सहशिक्षक बालाजी भोसले तर आभार अमर कांबळे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.