रयतेच्या हितासाठी अखंड प्रयत्नशील असणारा शिवाजी राजा” -प्रा. डॉ. वंदना लोंढे
इस्लामपूर दि. वार्ताहर: छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्मकांडात अडकून न पडता आयुष्यभर तर्कशुद्ध विचार व वैज्ञानिक दृष्टिकोनातून वाटचाल करत आठरा पगड जातींना एकत्रीत करून मनगटाच्या व बुद्धीचातुर्याच्या बळावर आदर्शवत असे रयतेचं हित जोपासणारे स्वराज्य उभा केले”. असे प्रतिपादन प्रा. डॉ. सौ वंदना लोंढे यांनी केले.
येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या इतिहास विभागामार्फत अग्रणी महाविद्यालय उपक्रम अंतर्गत आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, “स्वराज्यनिष्ठ मावळ्यांच्या बलिदानातून स्वराज्य उभे राहिले. मावळ्यांनी कोणतेही वतन किंवा जहागिरीची अपेक्षा ठेवली नाही, प्रसंगी प्राणत्याग करून स्वराज्याशी निष्ठा ठेवली. छत्रपती शिवरायांनी आदर्श स्वराज्य निर्मितीचे ध्येय अखेरपर्यंत उराशी बाळगले होते. अठरापगड जातीचे निस्वार्थी मावळे हेच शिवरायांच्या स्वराज्याचे अभेद्य किल्ले होते”.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अंकुश बेलवलकर म्हणाले, “न्यायप्रिय प्रशासन,समता रुजवणारे नेतृत्त्व
आणि रयतेच्या हितासाठी प्रगतिशील स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी राजे आपणास एक ऊर्जा स्त्रोत आहेत. शिवरायांनी स्वराज्य उभे करताना बुद्धिचातुर्य, विवेकनिष्ठता, अंधश्रद्धेला विरोध तसेच कर्मकांडात अडकून न पडता तर्कशुद्धपणे निर्णय घेऊन स्वराज्य चालविले. अखंड भारतामध्ये आदर्श निर्माण केला.”
शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पोस्टर स्पर्धेमध्ये कु. श्रद्धा चव्हाण कु. सुजाता पाटील कु.प्रतिक्षा खोत यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.
तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु.समृद्धी जंगम कु. रजिया मुलाणी व कु.साक्षी चाळके यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परीक्षण डॉ. संजीवनी पाटील डॉ. वृषाली पाटील डॉ.मेघा पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी केले. कार्यक्रमास डॉ .जहांगीर मुलाणी, प्रा. के. बी. पाटील, प्रा. बी.डी. खामकर, प्रा. श्रीकांत जाधव, प्रा. के.डी कुरुंदवाडे व डॉ. अशोक मरळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन प्रा. डॉ. राम घुले यांनी केले. प्रा. सुप्रिया कांबळे यांनी आभार मानले.