ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक
दिलेल्या वेळेत काम न केल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार, शिक्षक आमदार बाळाराम पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी ता. ३
कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी मागील महिन्याभरात तालुका निहाय बैठका घेऊन पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला. सदर दौऱ्यामध्ये अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध वैयक्तिक धोरणात्मक समस्या मांडल्या.उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी ऐकूण तसेच लेखी निवेदने घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार शिक्षक आमदार बाळाराम पाटील बुधवारी (दि.२) पालघर व ठाणे येथे शिक्षणाधिकारी कार्यालयात सभा आयोजित केली होती. दोन्ही जिल्ह्यातून आलेल्या समस्या एकत्रीत करून त्या सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित शिक्षण अधिकारी, पे युनिट अधीक्षक यांना तत्काळ देण्यात आल्या. प्रलंबित कामांसाठी शिक्षण अधिकाऱ्यांना वेळेचे बंधन देण्यात आले. दिलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई करणार असल्याचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले.
पालघर येथे शिक्षक आमदार पाटील यांच्यासमवेत झालेल्या सभेस मुंबई उपविभागीय शिक्षण उपनिरीक्षक सुनील सावंत, पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी लता सानप, पालघर -ठाणे पे युनिटचे अधीक्षक संतोष कांबळे तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दोन्ही जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील प्रमुख विषय आणि शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी प्रलंबित असलेली कामे पुर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना दिलेली वेळ मर्यादा पुढीलप्रमाणे :-
१) पीएफ सन २०१४ पासून पीएफ स्लिप खातेदारांना मिळालेल्या नाहीत.
(काम पूर्ण करण्यासाठी वेळ मर्यादा :-पीएफ १५ एप्रिल महिन्यापर्यंत आणि डीसीपीएस २० मार्च पर्यंत)
२) पर्यवेक्षक , उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मान्यता प्रलंबित आहेत.
( काम पूर्ण करण्यासाठी वेळ मर्यादा:- १५ मार्च)
३) जिल्हा बदली मान्यता प्रलंबित आहेत.
( काम पूर्ण करण्यासाठी वेळ मर्यादा:- १५ मार्च)
४) १२ वर्षे वरिष्ठ वेतन श्रेणी व २४ वर्ष निवड श्रेणी मंजूर प्रस्ताव प्रलंबित आहेत.
( काम पूर्ण करण्यासाठी वेळ मर्यादा:- १५ एप्रिल)
५) आरटीई मान्यता प्रलंबित आहेत.(तीन वर्षासाठी मान्यता)
( काम पूर्ण करण्यासाठी वेळ मर्यादा:- १२ मार्च)
६) आरटीइ प्रवेश परताव्याचे अनुदान प्रलंबित आहेत.
( काम पूर्ण करण्यासाठी वेळ मर्यादा:- १५ मार्च)
७) सेवा निवृत्ती पेन्शन प्रकरणे दोन वर्षापासून प्रलंबित आहेत आणि विनाअनुदानित मान्यता प्राप्त शिक्षकांना अनुदान तत्त्वावरील वैयक्तिक मान्यता मिळत नाही.
( काम पूर्ण करण्यासाठी वेळ मर्यादा:- ३० मार्च)
८) शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांची समस्या निवारण सभा होत नाही.
( काम पूर्ण करण्यासाठी वेळ मर्यादा:- जुन महिन्याचा पहिला आठवडा)
त्याचबरोबर, जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ पदी पदोन्नती देणे,संचमान्यता दुरुस्ती प्रस्ताव प्रलंबित आहेत, सातवा वेतन आयोग पहिला हप्ता सेवानिवृत्त शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचारी यांना अद्याप मिळालेला नाही, रजा रोखीकरण बिले प्रलंबित आहेत, बीडीएस चालू नाही, 40 टक्के अनुदानाची फरक बिले प्रलंबित आहेत, पुरवणी बिले वैद्यकीय बीले प्रलंबित आहेत, पायाभूत तुकड्यावरील शिक्षकांचे मान्यता प्रलंबित आहेत, विद्यार्थी नावात- जन्मतारीख जात बदलचे प्रस्ताव प्रलंबित राहतात, न्यायालयीन प्रकरणातील मान्यता प्रलंबित आहेत, दहावी-बारावी संकेतांक मान्यता पुन्हा मान्यता वर्ष-वर्ष दिले जात नाहीत पर्यायी दंड भरावा लागतो, अनुकंपा प्रलंबित प्रकरणे या प्रश्नांवर सविस्तर चर्चा यावेळी झाली. संबंधित सर्व समस्या युद्ध पातळीवर सोडविण्याच्या सूचना शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.
ठाणे येथील सभेसाठी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, ठाणे शिक्षणाधिकारी शेषराव बढे, पे युनिट अधीक्षक इतर संबंधित अधिकारी, जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.