धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रक्रम देऊ-मा. दिलीप वळसे पाटील
धनगर समाजाचे आरक्षण व धनगर समाजाचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवू असे प्रतिपादन गृहमंत्री मा. दिलीप वळसे पाटील यांनी आज मुंबई येथे केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंती निमित्त मुंबई येथील के.सी.कॉलेजच्या सभागृहात आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते.
राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समारोह समितीच्या वतीने मुंबईत प्रथमच सार्वजनिक जयंती आयोजित करण्यात आली होती. या समारंभास विधानपरिषद विरोधीपक्ष नेते मा.प्रविण दरेकर, विधान परिषदेच्या उपसभापती मा.निलम गो-हे, मा.खा.विकास महात्मे उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रपुरुषाला जाती धर्मात बांधता येत नाही. ते एका विशिष्ट समाजाचे असत नाहीत, ते सगळ्या समाजाचे असतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या राष्ट्रमाता होत्या. जगात सात लोकांना पुण्यश्लोक उपाधी दिली गेली आहे. त्यात राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर आहेत. एक उत्तम प्रशासक, उत्तम राज्यकर्ता व उत्तम न्यायप्रिय असा त्यांचा लौकिक होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य हे सर्व समाजाला प्रेरणा देणारे आहे.
विधान परिषद विरोधीपक्ष नेते मा. प्रविण दरेकर यांनी धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडी सरकार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असून धनगर समाजाच्या प्रश्नांसंबधी आपण विधान परिषदेमध्ये आवाज उठवणार असे सांगितले.
यावेळी बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ख-या अर्थाने छत्रपतींच्या वारस असून छत्रपतींच्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पना अहिल्यादेवींनी प्रत्यक्षात आणली, असे सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व समिती समारोह समितीचे अध्यक्ष श्री.गणेश हाके यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सांगून देशाची प्रगती व्हायची असेल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारावर पाऊल ठेवूनच मार्गक्रमण करावे लागेल आणि त्यामुळेच देश, धर्म व संस्कृती समृद्धी होईल असे सांगितले.
यावेळी धनगर समाजातील समर्पित मान्यवरांना व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मुंबई व उपनगरातून मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.