ताज्या घडामोडी

आभासी युगात टिकायचे असेल तर ध्येय निश्चित करा, शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील यांचे प्रतिपादन वाड्यात अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी ता. ९
आत्ताच्या स्पर्धेच्या आणि आभासी युगात आपल्याला टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या दृष्टीने अविरत मेहनत करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शिक्षण अभ्यासक तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील यांनी केले.

वाडा तालुक्यातील खानिवली येथील आ. ल. चंदावरकर विद्यालयामध्ये नुकताच आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना पाटील पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे शालेय जीवन म्हणजेच पुढील जीवनाची नांदी असून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीने मार्गक्रमण करणे आवश्यक आहे असे सांगून त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे आभासी जग कसं फसवं आहे याचे अनेक दाखले दिले.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सेवाश्रम शिक्षण संस्थेचे फिट पर्सन व्ही. जी. पाटील होते. पाटील यांनी बोलतांना सांगितले की, कोणत्याही शाळेची खरी संपत्ती ही त्या शाळेचे विद्यार्थी असून जेव्हा हे विद्यार्थी नावलौकिक कमावतात तेव्हा त्यांच्या आई-वडिलांएवढाच शिक्षकांनाही त्यांचा अभिमान वाटतो. तर शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा पाटील यांनी विद्यार्थ्यांनी शाळे प्रति आपलं नातं भविष्यातही असेच दृढ ठेवावे असे सांगून त्यांना परीक्षेसाठी आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शाळेचे पर्यवेक्षक राम पाटील यांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षीचा आदर्श विद्यार्थी केतन विलास जाधव तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून हर्षदा रविन्द्र वनगे यांची यावेळी घोषणा केली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह व ज्ञानार्जनाची मुक्ताई हे शिक्षण व्यवस्थेशी संबंधित असलेले पुस्तक देऊन गौरविण्यात आले.

विशेष म्हणजे या अभिष्टचिंतन सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि आयोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!