शाळांच्या विकासासाठी शालेय व्यवस्थापन समित्या सक्षम असणे आवश्यक : शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार
वाटद खंडाळा येथे शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण उत्साहात संपन्न
खंडाळा : प्रत्येक शाळेची शालेय व्यवस्थापन समिती ही सक्षम असल्यास, त्या शाळेचा सर्वांगीण विकास होत असतो. बदलत्या शासकीय धोरणानुसार शाळेचे सनियंत्रण करण्याबरोबरच शाळेचे आर्थिक व्यवस्थापन, भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे ह्या सर्व बाबी शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पूर्ण होत असतात, त्यामुळे शालेय व्यवस्थापन समित्या ह्या सक्षम होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती रत्नागिरी अंतर्गत गणपतीपुळे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार यांनी व्यक्त केले.
त्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) रत्नागिरी, शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी आणि शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शालेय व्यवस्थापन समित्याचे सक्षमीकरण होऊन त्या कार्यप्रवृत्त व्हाव्यात या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या वाटद केंद्रस्तरीय शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण शिक्षणाचा अधिकार कायदा अन्वये स्थापन झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सर्व माध्यमांच्य शाळांमध्ये कार्यभार सुरळीतपणे चालू रहावा यासाठी शालेय व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. बदलत्या नवनवीन धोरणानुसार सर्व बाबी व्यवस्थापन समिती सदस्यांना स्पष्ट व्हाव्यात यासाठी याच समितीतील सदस्यांचे शासनाच्या माध्यमातून शालेय व्यवस्थापन समिती प्रशिक्षण सक्षमीकरण प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. सदर केंद्रास्तरीय प्रशिक्षण रत्नागिरी तालुक्यातील वाटद मिरवणे केंद्रात नुकतेच संपन्न झाले.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत वाटद मिरवणेच्या सरपंच अंजली विभुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि राजमाता जिजाऊ, शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी उपसरपंच सुप्रिया नलावडे, गणपतीपुळे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, ग्रामपंचायत सदस्य बंडबे मॅडम, पालये मॅडम, सुनील ढवळे, सुहास मेस्त्री, वाटद मिरवणे केंद्राचे केंद्रप्रमुख तथा प्रशिक्षण केंद्राचे नोडल अधिकारी अनिल पवार उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत झाल्यानंतर सरपंच अंजली विभूते, उपसरपंच सुप्रिया नलावडे, ग्रामपंचायतीच्या सदस्य बंडबे मॅडम, केंद्रप्रमुख तथा नोडल अधिकारी अनिल पवार यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या संपूर्ण प्रशिक्षणात शालेय व्यवस्थापन समितीची रचना आणि जबाबदारी, आर्थिक सुविधांचे व्यवस्थापन, बालकांचे हक्क व सुरक्षितता, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, भौतिक सुविधांचे व्यवस्थापन, शाळा व्यवस्थापन आराखडा, कृती आराखडा, इतिवृत्त व यशोगाथा लेखन, सामाजिक अंकेक्षण या विषयावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून अमृता पानगले – इनामदार आणि माधव विश्वनाथ अंकलगे यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी वाटद केंद्रातील सर्व शाळांचे व्यवस्थापन समिती सदस्य आणि शिक्षक उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख तथा प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद खंडाळाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब कोळी, गोविंद डुमनर, अंजली कदम, मीना माने, सायव्वा पुजारी, नीलम वाडकर, पायल शिगवण यांनी सहकार्य केले.