राज्यातील शाळांमधील सुट्टीबाबत सुसूत्रता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर !
शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी दि.११
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ सुरू करणेबाबतचे शालेय शिक्षण विभागाने परीपत्रक जाहीर केले आहे.
संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला.
या निर्णयानुसार सोमवार दि.०२ मे, २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून, २०२२ पर्यंत ग्राहय धरण्यात येवून पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील. इयत्ता १ ली ते ९ वी व ११ वी चा निकाल दिनांक ३० एप्रिल, २०२२ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल, तथापि तो निकाल विद्यार्थी/पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधीत शाळेची राहील. शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्या परवानगीने घ्यावी. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील.
शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आपल्या गावी न गेलेल्या सर्वांनाच सुट्टीचा आनंद घेता येईल असे मत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांनी व्यक्त केले.