जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त ‘संघर्ष मानवी हक्कांचा’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न..
जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त ‘संघर्ष मानवी हक्कांचा’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न..
आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ११ डिसेंबर.
आधुनिक काळात जग हे मानवी हक्कांसाठी सजग व जागरूक झालेले आहे.असे असले तरीही कायदा व सुवस्था अंमलबजावणी यंत्रणेकडूनच मानवी हक्कांची पदोपदी पायमल्ली होत असताना समाजात विविध घटना घडत आहेत.शोषकांनी नवनवी रूपे धारण करून शोषणाची नवनवी तंत्रे विकसित केली आहेत.मुळातच मानवाधिकार हा विषय सामान्य माणसांचा असला तरी त्याकडेच दुर्लक्ष केले जात आहे.
सध्याच्या सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय घडामोडीत सत्तेच्या भयापोटी खरं बोलण्यापेक्षा बरं बोलण्यात किंवा तटस्थ भूमिका घेण्यातच बुद्धिजीवी वर्ग अडकल्याचे दिसत आहे.याच विषयाच्या अनुषंगाने विकास कुचेकर व आकाश भोसले यांनी संस्थेच्या माध्यमातून कार्य करीत असताना मानवी हक्कांसाठी घेतलेल्या भूमिका,अन्याय अत्याचारित पिडीत व्यक्तीच्या न्यायासाठी उठवलेला आवाज,प्रसंगी न्यायालयात दावा दाखल करून मानवी हक्क न्यायाची केलेली मागणी यातून न्यायाचे झालेले आदेश,आलेले अनुभव याचे संघर्ष मानवी हक्कांचा या पुस्तकात लेखन,संकलन केले आहे.याचबरोबर आंतरराष्ट्रीय समूहाने स्वीकारलेला मानवी हक्कांचा जाहीरनामा भारतीय संसदेने स्वातंत्र्याच्या ४२ व्या वर्षी पारित केलेला मानवी हक्क संरक्षण अधिनियम व त्यातून अस्तित्वात आलेला राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग,नागरी व राजकीय हक्कांवरील आंतरराष्ट्रीय करारनामा १९६६,आर्थिक,सामाजिक व सांस्कृतिक प्रसंविदा १९६६,भारतीय राज्यघटनेतील मानवी हक्कांचे प्रतिबिंब,व राज्य मानवी हक्क आयोगाने विविध प्रकरणात दिलेले न्यायनिर्णय तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालय यांनी मानवी हक्कांविषयी दिलेले न्यायनिर्णय या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत.
‘संघर्ष मानवी हक्कांचा’या पुस्तकाचे प्रकाशन जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त शशिकांत बोराटे ( पोलीस उपआयुक्त पुणे)नामदेवराव जाधव (लेखक,वक्ते,उद्योजक, डॉ सुधाकरराव जाधवर (माजी व्यवस्थापन समिती सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)ऍड गायत्री सिंग (जेष्ठ विधितज्ञ उच्च न्यायालय मुंबई)ऍड राजेंद्र अनभुले (जेष्ठ विधितज्ञ,उच्च न्यायालय,मुंबई)यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
पुस्तक प्रकाशनानंतर मनोगतात आकाश भोसले म्हणाले,आपणाकडे मानवी हक्कांची म्हणावी अशी जनजागृती झाल्याचे दिसत नाही.मानवी हक्कांची जनजागृती करण्यासाठी नव्याने चळवळ उभी राहणे गरजेचे आहे.हे पुस्तक लोकांना किती उपयोगी ठरेल यावर या पुस्तकाचे यश अपयश अवलंबून असणार आहे. सुधाकरराव जाधव म्हणाले की आकाश आणि विकास यांनी अन्याय अत्याचारित पीडितांच्या वेदना,केलेले वार्तांकन,भूमिका,उभा केलेला न्यायालयीन लढा या पुस्तकातून मांडलेला आहे.हे पुस्तक समाजपयोगी ठरेल तसेच एकाच पुस्तकावर न थांबता दोघांनीही असेच लेखन सुरू ठेवावे असे मत व्यक्त केले.
पोलीस उपआयुक्त शशिकांत बोराटे म्हणाले ,आकाश आणि विकास यांनी’संघर्ष मानवी हक्कांचे’ हे पुस्तक समाजात बदल घडवेल,पुस्तक लेखनासाठी दोघांचेही कौतुक करतो.कार्य असेच सुरू ठेवावे म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या.पद्यमजी सभागृह,मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे हा कार्यक्रम पार पडला अशी माहिती विकास कुचेकर ,आकाश भोसले,आण्णा जोगदंड,आण्णा मंजुळे यांनी दिली आहे.