वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेचे पाणी पूजन मंगळवारी रेठरे धरण तलावात होणार : आ. मानसिंगराव नाईक
शिराळा प्रतिनिधी : शिराळा वाळवा व कराड तालुक्यास हरितक्रांती घडविणाऱ्या वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील बंद पाइप मधून येणाऱ्या पाण्याचे पूजन रेठरे धरण तलावात मंगळवार दि.3 मे रोजी दुपारी 4 वाजता जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक,विश्वास चे संचालक विश्वास कदम,सुखदेव पाटील, सर्जेराव यादव आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थितीत होते.
या वेळी बोलताना आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले ,वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील बंद पाइप लाईनच्या पाण्याची चाचणी नुकतीच झाली आहे.त्यामुळे शिराळा व वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेसाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे दरवर्षी सातत्याने 100 कोटींचा निधी या योजनेसाठी दिल्यामुळे या योजनेला गती मिळाली आहे.ना.पाटील यांनी सुधारीत 908 कोटी रुपये योजनेसाठी मंजूर केले आहेत. आज अखेर 258 कोटी रुपये खर्च झाले आहेत.रेठरे धरण ,मरळनाथपूर व शिराळा तालुक्यातील उत्तर व दक्षिण भागास जयंत पाटील यांच्या मुळेच पाणी मिळाले आहे.
स्व.लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांची स्वप्नपूर्ती झाली आहे.वाकुर्डे योजनेचे पाणी 31 डिसेंबर 2011 ला करमजाई तलावात आले.सन 2014 ला शिवाजीराव नाईक आमदार असताना उघड्या कालव्यातून येणारे पाणी बंदीस्त पाइप लाईन मधून आणण्याचा बदल केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणार पाझर रोखला गेला.
यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले,बंद पाइपलाइन च्या माध्यमातून पाणी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीनीचे भूसंपादन वाचले त्यामुळे 65 कोटी रुपये वाचले तेच पैसे वाकुर्डे योजनेकरिता वापरता आले.वाकुर्डे साठी चांदोली धरणातील 6.98 टी.एम. सी.पाण्याची तरतूद आहे.त्यामुळे पाणी कमी पडणार नाही.वाकुर्डे योजनेसाठी नव्याने आंबेवाडी,शिरशी,निगडी ,पाडळे वाडी ,शिवरवाडी या गावचे क्षेत्र समाविष्ट झाले आहे. या योजेनेतील उर्वरित 102 कोटी रुपयांचे टेंडर पूर्ण झाले आहे.रेड ते ढगेवाडी येथील 500 मी.जमीन वनखात्याची असून या संदर्भात परवानगी लवकरच मिळून हे काम लवकरच पूर्णत्वास जाईल .सुरुल,ओझर्डे फाटा रेठरे धरण ते शिवपुरी फाटा येथील कामे येत्या 15 दिवसात पूर्ण होऊन पाणी शेतीला मिळेल.या वेळी सह्यायक अभियंता दीपक पारळे,सरपंच विजय महाडिक, महादेव जाधव,आदी प्रमुख उपस्थितीत होते.