‘या’ महत्त्वाच्या रस्त्यावर गेले वीस वर्ष अंधाराचे साम्राज्य
तळेगाव : यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग होऊन वीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु या द्रुतगती मार्गाला जोडणारा एक महत्त्वाचा रस्ता आजही अंधारात आहे. मावळ तालुक्यात द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका ते जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन किलोमीटरच्या जोड रस्त्यावर गेल्या वीस वर्षात एकही पथदिवे लागलेला नाही. यामुळे या मार्गावर रात्री भयाण अंधाराचे साम्राज्य असते.
पायी चालणाऱ्या वाटसरूंनाही येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांच्या प्रकाशात जीव मुठीत धरून मार्ग शोधावा लागतो. या ठिकाणी आजतागायत रात्रीचे असंख्य अपघात होऊन अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. या अंधाराचा फायदा घेऊन अपघातग्रस्त वाहने राजरोसपणे निघून जातात. त्यांचा वाहन क्रमांक घेणे अंधारामुळे शक्य होत नाही. अंधाराचा फायदा घेत या मार्गावर अनेकदा लूटमार झाली आहे. तर खुनासारखे गंभीर गुन्हेही येथे घडले आहेत.
याच मार्गावर असलेल्या उर्से एमआयडीसीतील कामगारांना जिवावर उदार होऊन रात्रीचा प्रवास करावा लागतो. तर पावसाळ्यात काही कामगार रात्रीचे घरी न जाता कंपनीतच मुक्काम करतात. चाकण खेड शिक्रापूर शिरूर या भागातील हजारो प्रवासी आणि मालवाहतूक वाहने चाकण एमआयडीसीतील अवजड वाहने याच मार्गाने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवेश करतात. तर अंदर मावळ व पवनमावळातील अनेक गावांना जोडणारा हाच मुख्य रस्ता आहे.
त्यामुळे तीव्र चढ-उतार, गर्द झाडी आणि रात्रीच्या अंधारात भयाण वाटणाऱ्या या मार्गाने रात्रीच्या वेळेस जीव धोक्यात घालून प्रवास करण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय राहीलेला नाही. गेल्या वीस वर्षात अनेक लोकप्रतिनिधी बदलले. सत्ताबदल झाले.परंतु संबंधित प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या दुर्लक्षित रस्त्याला प्रकाशाचा मार्ग अजूनही मिळालेला नाही.