साप्ताहिक भगवे वादळचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा!
साप्ताहिक भगवे वादळचा प्रथम वर्धापन दिन धारावी येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. साप्ताहिकाचे संपादक श्री. दत्ता खंदारे यांनी मान्यवर पाहुण्यांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी साप्ताहिक भगवे वादळचा विशेष अंक प्रकाशित करण्यात आला. साप्ताहिक भगवे वादळच्या प्रथम वर्धापन दिनानिमित साहित्य, वृत्तपत्रलेखन, पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक, शेती, क्रीडा व राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकारांना प्रबोधनकार ठाकरे उत्कृष्ट पत्रकारिता गौरव पुरस्कार, वृत्तपत्र लेखकांना दर्पणकार बाळशात्री जांभेकर पत्रभूषण गौरव पुरस्कार, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समजसेवकांस डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण गौरव पुरस्कार तसेच महिलावर्गासाठी रमाबाई रानडे समाजभूषण पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना सावित्रीबाई फुले शिक्षकरत्न गौरव पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले शिक्षकरत्न गौरव पुरस्कार, साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या साहित्यिकांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भगवे वादळच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्री. अभिजित राणे (कामगार नेते ), श्री. प्रफुल्ल फडके (संपादक : दैनिक मुंबई चौफेर), सौ. स्नेहल आंबेकर, श्री. अ. ना. रसनकुटे (ज्येष्ठ साहित्यिक), श्री. बाबुराव माने (मा. आमदार), श्री. दादासाहेब शिंदे (दलित मित्र, जेष्ठ वृत्तपत्र लेखक), डॉ. प्रवीण निचत (होप फाउंडेशन) आणि समाजसेवक श्री. राजेश खंदारे, श्री रमेश कदम आदी मान्यवरांनी उपस्थित राहून साप्ताहिक भगवे वादळला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व शुभाशिर्वाद देऊन प्रोत्साहन दिले. ज्येष्ठ कवी विलास देवळेकर यांनी साप्ताहिक भगवे वादळवर उत्स्फूर्त कविता लिहून उपस्थित मान्यवर आणि पुरस्कारकर्त्यांचे लक्ष वेधले. तसेच मुबंई वृत्तपत्र लेखक संघटनेच्यावतीने संपादक दत्ता खंदारे यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेष्ठ पत्रकार शशिकांत सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक दिलीप गाडेकर यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.