बजरंगदल-विश्वहिंदू परिषद तर्फे शिवकालीन उत्सवाचे पुनरुज्जीवन ; १८१८ साली कर्नल प्रौथर याने मावळातील दुर्ग जिंकून घेतल्यानंतर ही परंपरा खंडित झाली होती.
आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी २५ ऑक्टोबर.
बजरंगदल-विश्वहिंदू परिषद, मावळ शाखेच्या माध्यमातून शिवकालीन उत्सवाच्या ऐतिहासिक नोंदीप्रमाणे या उत्सवाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. शिवकालीन परंपरेप्रमाणे लोहगड वाडीच्या पाटलास विजयादशमीच्या दिवशी विसापूर दुर्गावरती नारळ वाढवून उत्सवाचा मान दिला जात असे.१८१८ साली कर्नल प्रौथर याने मावळातील दुर्ग जिंकून घेतल्यानंतर ही परंपरा खंडित झाली होती.
मागील सहा वर्षांपासून मावळ शाखेच्या वतीने हा उत्सव वीरबजरंगी बहुसंख्येने एकत्रित येऊन साजरा करतात. लोहगड वाडीचे पाटील साबळे यांना विजयादशमी निमित्त विसापूर दुर्गावर महादेव मंदिरासमोर सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हातून नारळ वाढवून या उत्सवास सुरुवात झाली. महादेवाचा महाभिषेक येथे करण्यात आला. आरती नंतर प्रास्ताविक. संदेश भेगडे यांनी केले. ते म्हणाले, “आपल्या ऐतिहासिक परंपरा या जागतिक दृष्टीने विज्ञानवादी आहेत. याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रतिवर्षी बहुसंख्येने उत्सव करण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे.”
दुर्गाचे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व तसेच समकालीन परंपरांचे ऐतिहासिक संदर्भ देत इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांनी व्याख्यान केले. ते म्हणाले,”नव्या भारतासमोर प्रचंड आव्हाने आहेत. त्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी शिवचरित्र हा एकमेव पर्याय आहे. जागरूक भारतीय बनून देशप्रेमी पिढी निर्माण होण्यासाठी आपला इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. मावळच्या इतिहासाला प्राचीन व मध्ययुगीन महत्व आगाध आहे. त्याचे कायम स्मरण आपण करणे हेच देशप्रेम आहे.”
ह.भ.प. गोपीचंद कचरे यांनी कार्यक्रमाची भूमिका जाहीर केली. सदर समारंभाचे अध्यक्षस्था. निलेश गराडे व प्रमुख पाहुणे. योगेश दळवी यांनी भूषविले. सतीश साठे यांनी शस्रास्र प्रात्यक्षिक शिवमंदिराच्या समोर सादर केले. आभार प्रदर्शन सुभाष भोते यांनी केले. पसायदानाने उत्सवाची सांगता झाल्यावर सहभोजन ह.भ.प. गोपीचंद महाराज कचरे परिवाराच्या तर्फे आयोजित केले होते.