पाटण ग्रामस्थांना स्मशानभूमित रस्त्याचे अभावी ओढ्यातून जावे लागते, तर निवारा शेड अभावी प्रवचनांचे कार्यक्रम होतात झाडाखाली.
आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २४ नोव्हेंबर.
पाटण ग्रामस्थांना स्मशानभूमित रस्त्याचे अभावी ओढ्याचे पाणी ओलांडून जावे लागते, तर निवारा शेड अभावी प्रवचनांचे कार्यक्रम झाडाखाली होत आहेत, त्यामुळे सुस्त झालेले प्रशासन व लोकप्रतिनिधी हे औंढेखुर्द ग्रामपंचायत चा आदर्श घेतील का ? असा प्रश्न ग्रामस्थांतर्फे केला जात आहे.
पाटण गावात काँक्रीटीकरण झालेले रस्ते, गल्लोगल्ली व टेकडीवरही पहायला मिळतात. येथे स्मशानभूमिकडे जाताना मधे ओढा लागतो, तेथे पाण्यामधून वाट काढीत ग्रामस्थांना व पाहुणे मंडळींना जा ये करावी लागते, यामुळै गावातील प्रशासनाकडे व लोकप्रतिनिधी यांचेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून आंधळे दळतय ! आणि कुञे पीठ खातय ! या म्हणीचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही.
येथे ग्रामस्थांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी व दहाव्यानिमित्ताने स्मशानात मोठ्या प्रयासाने जावे लागते. वरील धबधब्यावर असणारा ओढा येथून जातो. त्यावर छोटा पूल श्रीवाघेश्वरी देवीचे मंदिराकडे जाताना बांधलेला आहे, पण स्मशानभूमिकडे जाताना शेते तुडवत व पाण्यात पाय ठेवून दगडगोटे याचेवरून जावे लागते.
मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरकारतर्फे स्मशानभूमि बांधलेली आहे. पण शेड अभावी लोकांना उघड्या जागेवर झाडाखाली बसावे लागत आहे.
येथून जवळच शिवकालीन दगडी बांधकामाचे श्री.शिव मंदिर असून प्राचीन शिवमंदिराला चांगला ओटाही बांधलेला आहे. याचे मागील बाजूला प्रवचनांचे कार्यक्रम होतात.
स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाबत व निवाराशेड बाबत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भाऊसाहेब यांना विचारले असता, त्यांनी व कर्मचारी यांनी जागा कोणी देत नसल्यामुळे रस्ता व निवाराशेड काम करता येत नाही, असे मोघम उत्तर आवाज न्यूज प्रतिनिधींना दिले.