शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा – शाहीर हेमंत मावळे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला.
शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षांनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा – शाहीर हेमंत मावळे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला.One should try to implement the thoughts of Shivaji Maharaj – Shahir Hemant Mawle’s advice to students. शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षांनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी ११ डिसेंबर.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र खूप मोठे आहे. ‘शिवाजी महाराज की जय’ हे आपण शिवजयंतीला म्हणत असतो, मात्र त्यापलीकडे आपण फारसे जात नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या डोक्यात आणि ह्रदयात असले पाहिजेत. महाराजांचे विचार, चरित्र वकृत्व स्पर्धेतून मांडले ही चांगली गोष्ट आहे, आता महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करायला हवा असा सल्ला ज्येष्ठ शाहीर हेमंत मावळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
शूरवीर तानाजी मालुसरे प्रतिष्ठान, नरवीर तानाजी मालुसरे ग्रुप, श्री साई समर्थ सेवा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षांनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात मावळे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर, पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार, सामाजिक कार्यकर्ते बिरु खोमणे, हेमंत जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुभाष जेऊर आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मावळे म्हणाले, आज वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न केला असणार, आयुष्यात कोणत्याही स्पर्धेत जिंकणे, जिंकण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे मात्र त्याला सकारात्मकतेची जोड हवी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. तसेच लहान मुले, मुलींनी गुड टच – बॅड टच बाबत सावध राहिले पाहिजे असेही मावळे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.
विवेक खटावकर म्हणाले, आज मोबाइल, टीव्ही मुळे विद्यार्थ्यांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे, विद्यार्थ्यांनी दररोज किमान पुस्तकाचे एक पान किंवा वर्तमानपत्र वाचावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
योगेश पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. कोणतीही स्पर्धा असो त्यात विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे, जिंकणे किंवा हरणे हे महत्वाचे नसते त्यातून आपल्याला मिळालेला अनुभव आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी महत्वाचा असतो.
स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना नऱ्हे – आंबेगाव येथील शिवसृष्टीची सफर घडवणार असल्याचे बिरु खोमणे यांनी संगीतले या वक्तृत्व स्पर्धेत ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे परीक्षण अशोक भट, भूपाल पंडित, वृंदा करांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल जोशी यांनी केले, आभार अतुल वाघ यांनी मानले. तसेच राजेंद्र देशमुख राजेंद्र महाडीक, निवृत्त पोलिस उप निरीक्षक रविंद्र महाडीक, सुदीप निकम, दिनेश गायकवाड , विलास पाटील, राहुल बुचडे, शाम शिंदे, राजेंद्र क्षिरसागर, अंकिता क्षिरसागर, पराग शिवदास, संजय गंगावणे आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
वक्तृत्व स्पर्धेचा निकाल –
पहिली ते चौथी गट. राधिका समाधान सरवदे. निहारिका नामदेव काळे, शेख सजाया सिकंदर उत्तेजनार्थ -स्नेहल दत्तात्रय चोरघडे
पाचवी ते सातवी गट. अनुमित अमित पात्रे. सृष्टी संजय मद्देवाड . प्रिया हरिभाऊ डीगोळे, उत्तेजनार्थ — श्रद्धा दत्ता चोरघडे .
आठवी ते अकरावी गट. वैशाली वसंत केदारे . आकाश शिवाजी देवकारे . श्रावणी संदीप झिंगूरडे. उत्तेजनार्थ – श्रावण संदीप जांभळे, विशाखा योगेश बेंडळ.