दापोली नगरपंचायतीला राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा जल पुरस्कार
केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी विविध श्रेणीतील राष्ट्रीय जल पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली. ‘सर्वोत्कृष्ट माध्यम’ (मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक) या गटात सकाळ केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या २०२० साठीच्या जल पुरस्कारांची घोषणा शेखावत यांनी केली. जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दापोली नगरपंचायतीला राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा जल पुरस्कार मिळाल्याने दापोली नगरपंचायतीच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला गेला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत अतित्वात असताना नारगोली येथे धरण बांधण्यात आले होते.
मात्र या धरणात गाळ साठल्याने धरणातील पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली होती, मात्र तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी या संदर्भात पुढाकार घेऊन तसेच नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, सदस्य तसेच दापोलीतील सर्व स्वयंसेवी संस्था, नागरिक यांच्या मदतीने व दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या सहकार्याने या धरणातील गाळ काढला, पाण्याचे झरे पुनर्जीवित केले त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली व दापोली शहरातील पाणीटंचाई दूर झाली.
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत गटात सोलापूर जिल्ह्यातील सुरडी ग्रामपंचायत देशात तिसरी, सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था गटात दापोली नगरपंचायतीला दुसरा क्रमांक मिळाला आहे; तर सर्वोत्कृष्ट स्वयंसेवी संस्था ग्रामविकास संस्थेला (औरंगाबाद) विभागून तिसरा क्रमांक मिळाला. या सर्व प्रक्रियेची माहिती एका प्रस्तावाद्वारे पाठविण्यात आली, त्यानंतर या कामाची पाहणी करण्यासाठी समिती आली, या समितीतील सदस्य हे काम पाहून भारावून गेले होते अशी माहिती तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली. दरम्यान, तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे म्हणाले, “अशा प्रकारचा पुरस्कार असतो अशी माहितीच आम्हाला नव्हती. कोकण कृषी विद्यापीठातील जलसंधारण विभागाच्या प्राध्यापकांनी आमचे हे काम पाहिले व या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी मार्गदर्शन केले. आम्ही प्रस्ताव सादर केले. दापोलीचे नागरिक, नगरपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांनी दिलेल्या पाठबळामुळेच व कामामुळे हा पुरस्कार जाहीर झाला आहे.