“ज्या मातीत तुम्ही जन्माला आलात,ती माती यज्ञकुंड आहे” – अतुल पाटील
शिराळा प्रतिनिधी
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याचे तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न फक्त शिराळा तालुक्यातील लढवैयां मर्द मराठी मावळयांनी केला असून ज्या मातीत तुम्ही जन्माला आलात ती माती यज्ञकुंड आहे असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे धारकरी अतुल पाटील यांनी केले. ते रविवारी शिराळा येथे भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांना सोडवण्याचा झालेला एकमेव प्रयत्न म्हणजे “शौर्य दिन” म्हणून आज साजरा करण्यात आला यावेळी बोलत होते.
या कार्यक्रमास माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, नगराध्यक्ष प्रतीभा पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, प्रताप पाटील, जयसिंगराव शिंदे, रणजितसिंह नाईक पृथ्वीसिंग नाईक आदी प्रमुख उपस्थित होते.
शिराळा येथे सहा फेब्रुवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या कार्यक्रमाचे आयोजन श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने येथील भुईकोट किल्ल्यांवर करण्यात आले होते.
यावेळी अतुल पाटील म्हणाले, एकमेव शिराळा तालुक्यातील लढवैयांनी छत्रपती संभाजी महाराज यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. अखंड देश संकटात असतो त्यावेळी महाराष्ट्र उभा राहतो हा इतिहास आहे. आधुनिकतेच्या काळात इतिहास पुसता कामा नये. औरंगजेबचा सरदार मुखर्रबखानाच्या कैदेत स्वराज्याचे धाकटे मालक शंभुराजे यांना संगमेश्वर येथे अटक करून पुढे बहादुरगडावर घेऊन जात असताना फक्त शिराळा येथील निवडक सैनिकांनी शंभू महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता.यामध्ये शिराळा येथील सरदार तुलाजी देशमुख, अप्पाशास्त्री दीक्षित, जोत्याजी केसरकर व हरभरा वडार यांचेसह निवडक सैनिकांनी शंभू महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने यामध्ये या सरदार व सैनिकांना यश आले नाही. त्यामध्ये हे स्वराज्याचे सर्व शूर सैनिक धारातीर्थी पडले. तो दिवस म्हणजे 6 फेब्रुवारी हा होय. शिराळा तालुक्यासाठी हा अभिमानाचा क्षण व प्रेरणा देणारा असा दिवस आहे. प्रत्येक वर्षी हा दिवस “शौर्य दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. औरंगजेबाच्या तिनं हजार फौजे बरोबर तालुक्यातील दोन अडीचशे सैनिकांनी निकराची झुंज दिली परंतु अपयश आले.
माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यातील युवकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणी तेवत ठेवल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या विचारांचा राज्य निर्माण करण्याचे काम संभाजी महाराजांनी केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना सोडविण्याचा प्रयत्न फक्त शिराळा तालुक्यातून झाल्याचा अभिमान वाटतो.
यावेळी ॲड अक्षय कदम, पाडळी येथील पोलिस दलात कार्यरत असणारे संतोष पाटील, नगराध्यक्ष प्रतीभा पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
सकाळी साडे दहा वाजता तुळजाभवानी मंदिर गोपाळकृष्ण पत येथून भुईकोट किल्ल्यापर्यंत मुख पदयात्रा काढण्यात आली.
स्वागत व प्रास्ताविक निलेश आवटे यांनी केले. प्रशांत देशमुख, बाबासो गायकवाड, ज्योतीराम चिकुर्डेकर, प्रहारचे अध्यक्ष बंटी नांगरे, सुभाष देशमुख, संग्राम देशमुख,श्रेयश महाजन, अवधुत माजगावकर, रोहन म्हेत्रे, रोहीत गायकवाड, ऋतुराज पाटील, सार्थक माने, सोनाली पवार, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा रुपाली कदम, माजी पोलीस निरीक्षक दादासो गायकवाड भटवाडीचे सरपंच विजय महाडिक, आदींसह महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.