एसटी वाचवा,एस.टी वाढवा” समितीच्या वतीने एस.टी चे खाजगीकरण थांबवावे व एस.टी ची संख्या वाढवावी इत्यादी मागण्यांसाठी प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी, कामगार इ. लोकांच्या सह्यांची मोहीम
एसटी वाचवा,एस.टी वाढवा” समितीच्या वतीने एस.टी चे खाजगीकरण थांबवावे व एस.टी ची संख्या वाढवावी इत्यादी मागण्यांसाठी प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी, कामगार इ. लोकांच्या सह्यांची मोहीम घेऊन इस्लामपूर प्रांताधिकारी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.*
एस.टी.मुळेच खेड्यापाड्यातील लाखो मुलं शिक्षणासाठी शहरात पोहोचली व शिकू शकली. एसटी मुळेच शेतकऱ्यांचा शेतमाल, भाजीपाला, द्राक्षं,दूध शहरातपर्यंत पोहचली जातात. दूरवरच्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे एस.टी.ने च विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले. राज्याच्या कानाकोपऱ्यात गाव तेथे रस्ता, रस्ता तिथे एसटी हे सूत्र महामंडळाने स्वीकारल्यामुळे ग्रामीण भागात एसटीचे जाळे सर्वदूर पोहोचले. मुली आणि स्त्रिया यांचे सर्वात सुरक्षित वाहतुकीचे एकमेव साधन म्हणून एस.टी.कडे पाहिलं जातं. सामान्य जनता, कष्टकऱ्यांची असणारी ही जीवन वाहिनी,विद्यार्थ्यांची असणारी शिक्षण वाहिनी ठरलेली एस्टी ची वाटचाल खाजगीकरणाकडे होऊ लागल्याचे चित्र दिसू लागले. एसटीच्या संपकाळात महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे, नोकरदारांचे, एमआयडीसीतील कामगारांचे,शेतकर्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. एसटीच्या संपामुळे महाराष्ट्रातील रोजगार निर्मिती आणि विकासाला खिळ बसली आहे. या सगळ्या बाबी विचारात घेता जनतेनेच पुढाकार घेऊन एसटी वाचवा एसटी वाढवा ही मोहीम हाती घेतलेली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लाल परी रस्त्यांवरुन धावली पाहिजे. विद्यार्थी, सामान्यजनांची विकासाची गंगा चहूबाजूंनी पुन्हा एकदा वाहती झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने विविध जनसंघटना एकत्र येऊन ‘ एसटी वाचवा,एसटी वाढवा ‘ही मोहिम हाती घेतली आहे.
मुख्यमंत्री महोदय, आपण स्वतः एसटी वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि ही जनसामान्यांची जीवनवाहिनी रस्त्यावर आणावी ती वाढवावी यासाठी आम्ही आम जनतेच्या वतीने प्रांताधिकारी यांच्या मार्फत मा. नामदार मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. दीपक कोठावळे यांनी यावेळी सविस्तर भूमिका मांडली, यावेळी प्रा. डॉ. राजेश दांडगे, प्रा. डॉ. एस. के. खडसे, दीपक कोठावळे, , पंकज खोत, प्रा. डॉ. हरी पाटील, सुनील पाटील, दिग्विजय पाटील,उमेश कुरलपकर अतुल मोरे, विजय महाडिक, सागर रणदिवे, विक्रम सावंत, प्रा. पांडुरंग पाटील, मर्डीकर व व्यंकटेश सूर्यवंशी इ. कार्यकर्ते उपस्थित होते, तसेच निवेदनावर प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी, कामगार इ. लोकांच्या सह्या होत्या.
*एस.टी.वाचवा,एस.टी.वाढवा समितीच्या मागण्या…….*
१)विद्यार्थ्यांचे हित पाहून आणि अवैध प्रवासी मार्गाने होणारी सामान्यांची लूट पाहून सरकारने त्वरित एसटी पूर्ण क्षमतेने रस्त्यावर आणावी.
२) एस.टी हे महाराष्ट्रातील समस्त गोरगरीब बहुजनांचे सरकारी वाहन असलेने एस.टी.चे खाजगीकरण अजिबात करू नये.
३)एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय जाहीर करावा.
४) खेडोपाडी एसटीची सेवा तातडीने सुरू करण्यात यावी.
५)एस.टी.महामंडळातील भ्रष्टाचाराला आळा घालावा. इ.