विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर कौशल्य आत्मसात करावे : प्राचार्य डॉ. ए.के. वाळूंज
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर कौशल्य आत्मसात करावे : प्राचार्य डॉ. ए.के. वाळूंज Students should acquire skills along with education: Principal Dr. A.K. sand
आवाज न्यूज : गुलामअली भालदार चिंचवड प्रतिनिधी ०६ जानेवारी.
चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज मधील वनस्पतिशास्त्र विभागाने विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी “भरड धान्यावर आधारित -व्याख्यान सह प्रदर्शन“ आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या आयोजिका वनस्पतीशास्त्राच्या डॉ. निशा चौधरी यांनी सर्वांचे स्वागत केले, कार्यक्रम रूपरेषा सांगून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधीनी विद्यार्थ्यांना भरड धान्याचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख पाहूणे स्वप्नील नेवाळे यांनी आपल्या व्याख्यानात संपूर्ण भारतातील भरड धान्याच्या विविध जाती आणि त्यांच्या लागवडीच्या पद्धतींवर प्रकाश टाकला आणि सर्वसमावेशक पॉवरपॉइंट सादरीकरणासह विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवले. या कार्यक्रमात एक विशेष असे प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
जेथे विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने उच्च पोषक आणि आरोग्यास लाभदायक असे विविध भरड धान्यापासूनचे बनविलेल्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भरवून त्यांचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने हाताने बनवलेल्या राख्यांसह त्यांच्या कला आणि हस्तकलेला एक सर्जनशील स्पर्श दिला. नवनिर्वाचित प्राचार्य डॉ. ए. के. वाळुंज विद्यार्थ्यांशी सक्रिय संवाद साधत अशा उपक्रमांचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी भरड धान्यावर आधारित अन्न पदार्थांचे उत्पादने सुरू करावे आणि त्यातून त्यांच्या कुटुंबकारिता उत्त्पनाचे स्रोत बनावे आणि जवळपासच्या नाश्तागृहात आणि उपहारगृहामध्ये विक्रीसाठी ठेवावेत असे आवर्जून नमूद केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होतात, त्यापासून शेतकर्यांनी स्वताचे आत्मपरीक्षण करून आलेल्या परिस्थिती व आव्हानाला सामोरे जात त्यांनी शेतीला जोडून जोडउद्योग करावेत असे प्राचार्य यांनी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. वाळूंज यांनी आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाने विज्ञान समृद्ध करणारे शिक्षण, स्वयंपाकासंबंधीचा शोध – पौष्टिक मूल्य आणि कलात्मक अभिव्यक्ती यांची यशस्वीपणे सांगड घातली. सामाजिक कौशल्ये विकसित करणे, निरीक्षण कौशल्ये सुधारणे, आत्मविश्वास वाढविणे, जिज्ञासा वाढविणे, विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व समजून सांगितले, विद्यार्थांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. महाविद्यालयातून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. जयश्री मुळे, विज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. राजश्री ननावरे कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व सहभागींचे मूल्यांकन केले आणि त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.